Saturday, November 27, 2010

कसाब भाईना खत

श्रद्धांजली...
दोन वर्षांपूर्वी देशावर झालेल्या हल्ल्यात जीव गमावणा-या निरपराधांना आदरपूर्वक श्रद्धांजली... पुढील लेख (पत्र) हे कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने लिहिले गेले नसून, दुखावलेल्या भावना व्यक्त करण्याच्या हेतूने कागदावर उतरले आहे. देशाची अब्रू चव्हाट्यावर आणणा-या भ्रष्ट राजकारण्यांना शाब्दिक चपराक देण्याचा हा एक निष्फळ प्रयत्न आहे. त्या अब्रूची निंदा हल्लेखोर कशावरून करत नसतील???


----------------------------------------------------------------------------------------------------

                                                                      कसाब भाईना खत
वालेकुम अस्सलाम कसाब भाई,                                                                                नोव्हेंबर २६, २०१०

तुमची सगळी खैरीयत रहावी, यासाठी अल्लाकडे नमाज अदा केली आणि हे खत लिहायला बसलो. तशी तुमच्या खैरीयतीसाठी अल्लामियांसकट कोणीही फिकर करण्याची जरूरत नाही, याची आम्हाला जानकारी आहेच. एवढंच काय, आम्हाला तुमचा हेवाही वाटतो. आपण घडवून आणलेल्या हल्ल्याला आज दोन सालं पूर्ण झाली. गिरफ्तार होऊनही आपण आज सहीसलामत जिंदा तर आहातच; पण काफरांनी चालवलेली तुमची खातरदारी पाहून होणारी खुषी आम्ही शब्दांत नाही मांडू शकत.

तुम्ही अल्लाला अदा केलेला जिहाद त्याने मंजूर केल्याचीच ही निशाणी आहे. आजही आम्हाला तुमचं बचपन चांगलंच याद आहे. ज्या वयात हिंदुस्थानातील पोरं भविष्याची चिंता करत पढाईत वक्त जाया करतात, ज्या वयात अमेरिकेतली गोरी औलादं लौन्ढीयांच्या पाठीमागे शेपट्या घालतात, त्याच वयात तुम्ही नेक इराद्यांनी बंदुकी हाताळत होतात. त्या पर्वर्दीगाराची लाजवाब करामतच आहात तुम्ही. तुमच्यातली ही होशियारी आम्ही खूप आधीच हेरून ठेवली होती.

सचमे, समिन्दराच्या वाटेनं दोन महिने प्रवास करून त्या नापाक धर्तीपर्यंत जाणं, किती जिकिरीचं राहिलं असेल, याची आम्ही कल्पना करू शकतो. पण अल्लाच्या बंद्याला डर कसचं? मुंबैच्या त्या रेल्वे स्टेशनवरची सी.सी.टीव्ही.वर दिसलेली तुमची आत्मविश्वासभरी चाल सगळं काही बोलून गेली. बेछूट गोळीबार करत सुरु असलेली तुमची दौड पाकच्या भूमीवरची तुमची मोहोब्बतच दाखवून देत होती. गिरफ्तार होण्यापेक्षा मोक्षाचा मार्ग स्वीकारणं, तुम्ही पसंत केलं असतं, याची आम्हाला जाणीव आहेच. काफिरांच्या कत्तलीनेच आपल्याला जन्नत प्राप्त होते, हे सर्वात मोठं सच आहे. पण त्या जन्नतीपेक्षाही जादा अमिरी तुम्ही अनुभवता आहात. दर महिन्याला दोन करोड रुपये हिंदूस्थानी हुकुमत तुमच्या सुरक्षिततेसाठी खर्च करते, असं आम्ही ऐकून आहोत. कोण्या हवालदाराला परवा तुम्ही लगावलेली थप्पडही ऐकली आम्ही. तुमच्या या काबिलीयतीला आमचा बारबार सलाम!

खुलेआम सडकांवरून जरी तुम्ही तुमची दहशत गाजवू शकत नसलात, तरी कोर्टातला तुमचा गुरुर, तिथल्या हुकुमतीशी वागण्यातला तुमचा जुनून इन्शाल्ला आपल्या येणा-या नसलांसाठी आदर्श ठरत आहे. त्या पाटील आणि खडसेला दिलेलं तुमचं जवाब बेशक काबिले-तारीफ होतं. दोन सालं गुजरली, तरी तुम्हाला तुमच्या करतूतीचा पछतावा नाही, याची जाणीव तरी हिंदूस्थानला झाली! मागेच खरंतर त्या रामूनी तुमच्या जिंदगीवर फिल्म काढली असती; पण थोडक्यात माशी शिंकली. तसा, इतिहास गवाह आहे... काफरांची याददाज कमजोरच आहे जराशी! थोडेच दिवसात ते सगळं भूलून जातील. चाचा अफझल गुरूना सध्या कोणी गाली तरी देतं का? तसेच लोक तुम्हालाही भूलतील. कदाचित हुकुमतीने नेमलेले वकील, उज्ज्वल निकम, केस तुमच्या खातीर जिंकतीलही!

आम्ही इथे त्या वक्ताचा इंतजार करत आहोत. तुमच्या कदमांवर कदम ठेवू पाहणारे काफी नौजवान इथे बंदुका चालवायला शिकत आहेत. तुम्ही स्वत: त्यांना मार्गदर्शन करू शकाल, अशी अल्लाकडे प्रार्थना करतो. बाकी, मुंबईत याही वेळी आवामने दिये लावले; फुलं चढवली; आणि अशाच काही हरकती केल्या. काहींनी आसू ढाळले... तर काहींचे तेही सुकले होते. लेकीन, या सगळ्याचा आपल्या इराद्यांवर कोणताही असर होण्याचा सवालच येत नाही. जिहाद हाच मोक्षाचा मार्ग आहे. आणि तोच आपल्याला जन्नतीपर्यंत पोहोचवेल.

तुमच्या या कर्तबगिरीची मिसाल म्हणून आज संध्याकाळी इकठ्ठा नमाज ठेवली आहे. तीही अल्ला मंजूर करेल, अशी अशा करतो.

इंतकामची आग अशीच भडकत राहू द्यात. अगल्या साली, तुम्हीही या नमाजीत सामील व्हाल, हीच ख्वाईश...

खुदा हाफिज,
अब्दुल रहमान काझी
('अब्दुल रहमान काझी' हे नाव पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध लावला जाऊ नये. तसा तो प्रवृत्तीशी लावला जाऊ शकतो.)
(Credits: www.sbs.com for the only image in the post.)

Monday, November 1, 2010

पुन्हा एकदा!!!

ऑक्टोबर महिन्याची अखेर...
बुधवारचा दिवस... आणि मध्यान्हीचा सुमार...
रेंगाळलेल्या पावसाळ्यामुळे सगळीकडे हिरवळ होती खरी; पण उन्हाची तीव्रता त्या मखमलीलाही धुमसत होती. गारव्याऐवजी रखरखाटच अधिक होता. इतक्यात पश्चिमेकडनं घोंघावणारी एक वा-याची झुळूक आली. अशा रुक्ष वातावरणाला वा-याची ती झुळूक सुखावणारी असली; तरी तिचं ते घोंघावणं जरा उद्विग्नता वाढवणारं होतं.

पद्मावतीभोवती दोन प्रदक्षिणा घालूनही ही झुळूक काही शमत नव्हती. मधेच हुक्की आल्यावर ती सुवेळेच्या अंगाला लगट करत थोडी दूर जायची... आणि पुन्हा आल्या वाटेने परत फिरून बालेकिल्ल्याला फेर धरायची. तिचं असं बागडणं जरी अगदीच नवीन नसलं, तरी ते घोंघावणं जरा त्रासदायक वाटत होतं. वैतागून एक-दोनदा राजगडाने आळोखे-पिळोखे देत तिला फटकारून पाहिलं; पण त्या फटका-याने ती शेजारीच पसरलेल्या तोरण्याच्या बुधल्याला पिंगा घालून पुन्हा 'डोक्यात'(!) शिरायची.


ही काही आपल्याला स्वस्थ पडू देणार नाही, हे लक्षात आल्यावर राजगड तिच्यावर गुरकावलाच. पुरंदरापल्ल्याड माळरानावर जाऊन गोंधळ घालण्याची सूचना करूनही ती ऐकतच नाही म्हटल्यावर मात्र तो हात-पाय ताणून ताठ झाला. वा-याची गचांडी धरून दूर पूर्वेकडे भिरकावून देण्याचे क्रूर विचार त्याच्या मनात आले खरे; पण परगण्यात राजगडाचा दरारा होता. त्यामुळे सूचना किंवा फारफारतर धमकीवर त्याचं काम चालून जाई. हातघाईवर येण्याची वेळ उभ्या आयुष्यात राजगडावर कधी आलीच नाही!

डोक्याखाली हाताची उलटी घडी करून पडलेला तोरणाही वा-याची ही मस्ती बराच वेळ पाहत होता. राहून राहून त्यालाही या गोष्टीचं कुतूहल वाटतच होतं, की या राकट राजगडासमोर क्षुद्र वा-याची कसली ही मिजास! भल्या-भल्यांना चळाचळा कापायला लावणारा हा राजगड... त्यानं मनात आणलं, तर या वा-याला आजूबाजूला हुंदडणंही मुश्कील होईल. राजांचा लाडका म्हटल्यावर कोण त्याला डिवचण्याची हिंमत दाखवणार!!!

इतक्यात तो वारा संजीवनी माचीच्या वरच्या अंगानं सरळ बालेकिल्ल्य्यात शिरला आणि आतल्या आत विरूनही गेला. नाहीसं होण्यापूर्वी तो राजगडाच्या कानात काहीतरी कुजबुजला असावा; कारण त्यानंतर तो करारी गिरीदुर्ग असा काही आंतरमुख झाला, की काही क्षण झाडांनी सळसळाट थांबवला; पक्ष्यांनी किलबिलाट बंद केला; आसपासचे दोन-तीन ढग सूर्यासमोर येऊन विसावले; सावजाला शोधणा-या तिथल्या एका ससाण्यानेही परिस्थिती लक्षात घेऊन दक्षिणेकडे मोर्चा वळवला.

एवढ्यात, भानावर येत राजगडाने तोरण्याला साद घातली... 'आपला रायगड पुन्हा एकदा ढासळलाय रे! सतत रडतोय म्हणे!' आता मात्र तोरण्यालाही कळून चुकलं. घोंघावणा-या वा-याच्या मनातलं गूज त्या ताठ, स्वाभिमानी, निश्चल, निर्विकार आणि शक्तिशाली रायगडाची व्यथा सांगून गेलं होतं. खरं पाहता, या उत्तुंग जोडगोळीसाठी हे ही धक्कादायक नव्हतं. रायगड सध्या वरचेवर अश्रू ढाळतो, याची माहिती आणि त्यामागची कारणं त्यांना वारंवार मिळत असत.

आधल्याच दिवशी कुणी उत्साही सहयमित्र रायगडावर मुक्कामासाठी गेला होता म्हणे. सवयीप्रमाणे सूर्योदयाला दरबारात हजर राहून त्याने महाराजांना लवून मुजरा केला. पुढे बराच वेळ तो महाराजांच्या त्या मूर्तीकडे एकटक पाहत होता; कसलंतरी गा-हाणं मांडत होता; विनवण्या करत होता... "महाराज, तुम्ही परत या. परत या, महाराज. या ख-या अर्थाने 'दगडांच्या' देशाला पुन्हा एकदा तुमची गरज आहे. दासबोधातली वचनं विसरलेल्या या संतभूमीला एका कणखर नेतृत्वाची ओढ लागली आहे. पैशापायी या पुण्यभूमीचं इमान विकायला निघालेल्या नतद्रष्ट नेत्यांना वेसण घालायला परत या, महाराज. अहो, संरक्षणदलाच्या अखात्यारीतून सहकारी गृहसंस्थेतील घरं आपल्याच नातेवाईकांना भेट म्हणून देणारा भ्रष्टाचारी दुसरा-तिसरा कुणी नसून तुमच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे......". त्याला पुढं बोलवेना. तसा... त्याच्या शब्दांचा महाराजांवर कसलाही परिणाम होतंच नव्हता. कारण त्या मूर्तीमध्ये महाराज होतेच कुठे? समोर होती ती फक्त प्राणहीन मूर्ती! पण हे शब्द खुद्द रायगडाचं काळीज फाडत खोलवर रुतत गेले. त्याला राहवेना आणि त्याने अक्षरश: हंबरडा फोडला...

सहाजिक आहे हो! गेल्या काही वर्षात 'आप्त-स्वकीय' म्हणवून घेणा-या किंवा 'शिवप्रेमी' म्हणवणा-या स्वजनांनीच अशी काही वर्तणूक केली होती, की तीन शतकांहूनही अधिक काळ ताठ मानेनं उभ्या असलेल्या त्या किल्लेशानंही अखेर धीर सोडला होता. इतिहासात, महाराजांच्या पश्चात फितुरीनं झालेल्या हल्ल्याला त्या स्वाभिमानी रायगडानं असा काही प्रतिकार केला होता, की पराभवानंतरही बारा दिवस जळत होता तो; स्वराज्य तेवत होता तो! पण आज होत असलेली जनतेची ससेहोरपळ त्याला हिणवते आहे; राज्यकर्त्यांनी चालवलेला अतोनात भ्रष्टाचार त्याला रक्तबंबाळ करतो आहे; एकेकाळी सबंध चराचरसृष्टीची निष्ठा अनुभवणा-या त्याला वर्तमानातला नाकर्तेपणा आणि बेइमान दु:खी करतो आहे.

आणि या सगळ्यावर ताण म्हणून की काय, पण शिवराय सध्या रायगडावर वावरातच नाहीत! वावरतो, तो त्यांच्या मनातला सल... स्वराज्याची गाणी त्या दरबारात घुमतच नाहीत! घुमतात, ती फक्त दयनीय जनतेची गा-हाणी... सूर्याची सोनेरी किरणं त्या अजिंक्य सिंहासनावर नतमस्तक होतंच नाहीत! पाया पडतात, ती काही दुर्बल टाळकी...

आणि हे सगळं असंच्या असं माहीत असूनही, तिकडे तोरण्याने आपली बेलागता त्यागलेली नाही किंवा राजगडाने आपली अभेद्यता सोडलेली नाही. त्यांची निष्ठा कायम आहे! वेळ काढून गिर्यारोहणाला येणा-या असंख्य सहयप्रेमीना ते शिवचरित्र ऐकवतात; भूतकाळातले ते रोमांचकारी क्षण रंगवून रंगवून सांगतात; स्वराज्याची गळ घालतात; जिद्द-चिकाटीची शिकवण देतात.... त्यांना अजूनही आशा वाटते... रायगडाला पुन्हा एकदा जाग येईल... रायगडाला... पुन्हा एकदा जाग येईल...