Sunday, August 28, 2011

"मी (विरुद्ध) अण्णा हजारे"

- शेखर श.धूपकर

        १५ ऑगस्टची 'सुट्टी' उपभोगून मी १६ तारखेला जेव्हा दूरदर्शन संच सुरू केला, तेव्हा 'अण्णा हजारेंच्या' अटकेची बातमी मेला समजली. मला रागच आला जरासा...; पण मग मी स्वत:ला शांत करत इतर कोणत्याही बातमीप्रमाणे ती ही पाहत चहा रिचवला. संध्याकाळपर्यंत मात्र माझ्यात जोष संचारला आणि मग 'मी अण्णा हजारे' लिहिलेली एक गांधीटोपी मिळवून मी माझ्यासारख्याच इतरांबरोबर 'रस्त्यावर उतरलो'.

        हा अनुभव वेगळाच होता. हो! म्हणजे दीडशे वर्ष आपल्यावर राज्य केलेल्या ब्रिटीशांच्या भूमीवर भारतीय क्रिकेटमधील वीर पानिपाताचा अनुभव घेत असताना देशातल्या रस्त्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिरंगा फडकताना पाहणं, ही तशी ऐतिहासिक घटनाच होती. घटनेच्या त्या ऐतिहासिक मूल्यामुळेच असेल कदाचित; पण मला कसलं तरी स्फुरण चढलं होतं. ते देशभक्तीचंच असावं, असा तर्क लावून मी ही माझ्यासारख्याच इतरांनी दिलेल्या 'भारत माता की...' च्या घोषणेला 'जय' असं ओरडत होतो.

        त्या संध्याकाळच्या जोषामुळे आलेला थकवा नाही म्हणायला रात्री हाडांमधून जाणवत होता. निवांत झोप झाल्यावर मात्र अण्णांचा उपोषणाचा सुरु असलेला हट्ट पाहून मला पुन्हा जोम चढला. आज 'मी' कालच्या गांधीटोपीच्या जोडीला पांढराशुभ्र सदरा परिधान केला. ऑफिसातल्या आणखी चार-पाच जणांनाही 'मी' माझ्यासोबत 'रस्त्यावर ओढलं'. "जन लोकपाल" नामक कोण्या एका बिलाचं समर्थन आम्ही सगळे करत होतो.

        हे सगळंच इतकं सुखद होतं की, दिवसें-दिवस माझ्यातल्या देशभक्तीला निरनिराळ्या वाटा मिळू लागल्या होत्या. म्हणजे आज मेणबत्ती घेऊन मूक पदयात्रा, तर उद्या दुचाकीवरून फेरी; परवा भर चौकात धरणं, तर तेरवा मी चक्क दिल्ली गाठली. दिल्लीतलं वातावरण तर रोमांचकारी होतं. पहावं त्याच्या डोक्यावर गांधीटोपी आणि अंगात पांढरेशुभ्र सदरे! इथे कुणाला धर्म नव्हता की जात; भाषा नव्हती की प्रांत; पक्ष नव्हता की मतभेद! सगळेच भारतीय!!! अण्णांच्या नावाच्या या टोपीतली जादू ती घातल्याशिवाय अनुभवणं निव्वळ अशक्य आहे. 'मी अण्णा हजारे' या तीन शब्दांच्या उच्चारातली ताकदही ती न उच्चारलेल्याला कशी समजावी???

        'मी अण्णा हजारे' असं लिहिलेली ती टोपी डोक्यावरून काढून मी तिच्याकडे कुतूहलाने पाहू लागलो; आणि तेवढयात, विजेचा झटका बसावा, तसं माझं डोकं अचानक ठिकाणावर आल्याची जाणीव मला झाली. माझं कुटुंब, माझं ऑफिस, माझा पगार, तो वाढवण्याची माझी जिद्द, माझा आनंद, तो उपभोगण्याच्या माझ्या पद्धती या सर्वांची आठवण मला झाली आणि मी तडक घर गाठलं.

        दुसऱ्या दिवशी, डोक्यावर चढलेलं देशभक्तीचं खूळ (टोपीसकट) उतरवून मी दैनंदिनीत व्यस्त झालो. ऑफिसला जाताना झालेला उशीर कमी व्हावा, या प्रयत्नात कोणताही सिग्नल मी पाळला नाही. त्यापैकी एकावर वाहतूक-मामाने अडवल्यावर शंभराची नोट पटकन त्याच्या हातावर टेकवत मी केलेल्या चुकीची दुरुस्ती केली. (त्या नोटेवरच्या गांधींनीही त्यांची टोपी उतरवून ठेवलेली होतीच!) ऑफिसमध्ये पोहोचल्यावर पगार वाचवण्याच्या अपेक्षेने दोन(च) दिवस सुट्टी घेतल्याचा आव आणून उर्वरीत तीन दिवसांची रजा नोंदवली नाही. पुढे, परदेशगमनाच्या संधीच्या आनंदात, पासपोर्ट परीक्षणासाठी आलेल्या हवालदाराला दोनशे रुपयांची 'फी' मी 'खुशीने' दिली. परदेशाच्या प्रवासासाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदीवरचा कर चुकवावा, म्हणून त्या पावतीशिवायच खरेदी केल्या. दरवेळेप्रमाणे, नोंद नसलेल्या ग्यास-सिलिंडरसाठी तो आणून देणाऱ्या दूताचा खिसा मी 'तसाच' 'जड केला'... आणि, रात्रीच्या जेवणाच्या वेळी सरकारवर यथेच्छ टीका केली.

        थोडक्यात काय..., माझ्यातला 'मी' परत आल्याचा अनुभव घेत घेत देश, सरकार, व्यवस्था, यंत्रणा, जनता, भ्रष्टाचार (आणि बायको!) यांच्यावर तोंडसुख घेण्याचा परवाना मी परत मिळवला. बाकी, रात्रीच्या बातम्या पाहताना एक गोष्ट मला जरा खटकलीच... अण्णांची टोपी मात्र कोरीच होती!!!

Sunday, May 29, 2011

दर्शन

                कोल्हापूरची महालक्ष्मी हे आमचं कुलदैवत. महिलांना गाभाऱ्यात नसलेल्या प्रवेशावरून नुकत्याच झालेल्या गदारोळाने मन अगदी सुन्न झालं आणि देवीच्या दर्शनाला जायचं मी ठरवलं. खरंतर, या उद्विग्नतेचा, महालक्ष्मी आमची कुलदेवता असण्याशी काडीचाही संबंध नव्हता. आणि महिलांच्या प्रवेशाबद्दलच बोलायचं, तर त्यांना तो मिळत नसे, हीच माझ्यासाठी 'बातमी' होती.

                ... तर, मी गाडी काढली आणि तडक कोल्हापूर गाठलं. शुक्रवारचं ऑफिस उरकून निघालो असल्यामुळे रात्री उशीर झाला होता. त्यामुळे, आता सकाळीच दर्शन होणार, हे निश्चित होतं. अस्वस्थतेमुळेच असेल कदाचित पण शांत झोप लागली नाही आणि पहाटे पावणे-पाच वाजता मी मंदिरात प्रवेश केला.

                सकाळी खूप लवकरची वेळ असल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता. मंदिराच्या कमानीत असलेली सुरक्षा यंत्रणा गाढ झोपेत होती. मी वाकून पहिल्या पायरीला स्पर्श केला आणि मंदिरात प्रवेशकर्ता झालो. वर्षानुवर्ष येऊनही आज मी महालक्ष्मीचं मंदिर नव्यानेच पाहत होतो. गर्दी नाही; रेटारेटी नाही; रांग तोडणा-यांना शिवीगाळ नाही; उकाड्याचा त्रास नाही की कसला वैताग नाही. देवळातले ते दगडी खांब आणि त्यांवरचं कोरीवकाम प्रसन्नपणे ती शांतता उपभोगत होते. तरीही मी नेहमीच्याच वाटेने गाभा-यापर्यंत पोहोचलो.

                दरभेटीत देवीच्या इथून होणा-या दर्शनापेक्षा आजचं दर्शन खूपच वेगळं असणार, हे तर निश्चित होतं. मी जोडलेल्या हातांनी गाभा-यासमोर उभा राहिलो आणि थबकलोच! पुन्हा पुन्हा डोळे चोळून आणि स्वत:ला चिमटे काढून पाहिलं; पण नाही... गाभा-यात महालक्ष्मीच नव्हती!!! मला काहीच समजेना! सकाळची पूजा करायला आलेले पुजारी महोदय आपली पूजा सवयीप्रमाणे उरकत होते. पण ते जिची पूजा करत होते; तीच तिथे उपस्थित नव्हती. माझी बेचैनी कमी होण्याऐवजी शिगेला पोहोचली. त्याच मन:स्थितीत मी प्रदक्षिणा घातली; आणि मंदिरातून बाहेर पडू लागलो.

                इतक्यात मला कसलीतरी कुजबूज कानावर पडली. देवळात भिंतीलगत अंधारात एक आजीबाई काहीतरी पुटपुटत असल्याची जाणीव मला झाली. त्या मलाच तर काही म्हणत नाहीत ना, अशी शंका येऊन मी त्यांची विचारपूस केली. 'हेच माझं घर' असं त्या म्हणाल्या. रोज लाखोनी लोकं दर्शनाला येतात; पण त्यांच्याकडे लक्ष गेलेला मी पाहिलाच होतो, असं त्यांना वाटत होतं.

                मला परत जाण्याची घाईही नव्हती आणि अस्वस्थता काही केल्या कमी होत नव्हती. त्यामुळे मी न ठरवताच त्या आजींपाशी जाऊन बसलो होतो. न राहवून मी जेव्हा 'आत देवीच दिसली नाही', असं त्यांना म्हणालो; तेव्हा त्या नुसत्याच हसल्या. खरं होतं म्हणा!!! माझ्या अशा बोलण्यावर थट्टेशिवाय कोणीही काय प्रतिक्रिया दिली असती... मी ही जरा वेळ शांतच राहिलो.

                काही वेळाने आजीबाईच म्हणाल्या, "विठू, साई, भवानी असे सगळेच असतात रातच्याला इथं. आम्ही तशा फारशा गप्पा मारत नाही; पण सगळ्यांचीच दु:ख एकमेकांना ठाऊक आहेत. बोलणार तरी काय? आणि कोणाला? ... तो साई... लई श्रीमंती पाहतोय. आयुष्यभर फकीर म्हणून जगला; आणि आता... आता सोन्याशिवाय काहीच पहायला मिळत नाही, म्हणतो. भवानेला दहा वेळा इचारलं, तर लेकरं भेटायलाच येत नाहीत, एवढंच बोलते. त्यातल्या त्यात विठूचीच परिस्थिती आमच्यात बरी! श्रीमंती नाही पाहिली त्यानं फारशी; पण दारिद्र्यातही पुष्कळ प्रेम मिळालं त्याला..."

                आजीबाई बोलत होत्या आणि मी मान डोलवत होतो. मधेमधे 'मी ऐकतोय' एवढं पटवून द्यायला हुंकार देत होतो. आजीबाईंना कदाचित बोलायला कुणीतरी हवं होतं; आणि मी 'आयताच गावल्यामुळे' त्यांना कंठ फुटला होता. मी मात्र अजूनही कसल्या तरी शोधात माझीच अस्वस्थता वाढवत होतो. बोलता बोलता आजीबाईंनी त्यांच्या हातातला अर्धा पेढा माझ्यापुढे केला; मी ही तो 'प्रसाद' म्हणून खाल्ला. पुन्हा त्यांच्या गप्पा आणि माझे हुंकार अशी जुगलबंदी काही काळ चालली.

                आता थोड्या वेळात उजाडणार, अशी जाणीव समोरच्याच झाडावरच्या चिमण्या करून द्यायला लागल्या होत्या. बाहेर कोणाची तरी चाहूलही लागायला लागली होती. 'आता आपण निघावं' असं मला वाटायला आणि अचानक आजीबाईंनी जागेवरून उठायला एकाच गाठ पडली. इतक्या वेळ अंधारात त्यांच्या चेह-यावरचे हावभावही नीटसे पहायला न मिळालेल्या मला त्यांनी नेसलेली हिरव्या रंगाची नेटकी साडी आश्चर्याचा धक्का देऊन गेली.

                "आताशा गर्दी व्हायला लागेल. मला जायला हवं.", असं काहीसं म्हणाल्या त्या. "तुझ्या सारखी खूप लेकरं येतात रोजच्याला; पण फारसं ध्यान मात्र कुणीच देत नाही", असा दिलासा त्यांनी पुन्हा एकदा मला दिला. मी ही त्यांच्या पायांना वाकून स्पर्श केला; तेव्हा "येत जा वरचे वर!", असं कळकळीनं म्हणाल्या त्या!!!

                मी पायात चपला घालेपर्यंत आजीबाई पुन्हा मंदिरात गेल्या होत्या. मी ही पुन्हा गाडीकडे वळालो. जेवणापर्यंत पुण्यात घरी पोहोचण्याचा हिशेब लावून मी दर्शनासाठी महादरवाजातून उलटा फिरलो आणि देवीला हात जोडून नमस्कार केला. महादरवाजातून थेट होणारं महालाक्ष्मीचं दर्शन मला सुखावून गेलं. इतक्या वेळची अस्वस्थता काहीशी कमी झाल्यासारखं वाटलं आणि मी एकदम गडबडलो.

                काही क्षण तिथूनच दर्शन घेत राहिल्यावर मात्र मी स्वत:शीच हसलो. हलक्या झालेल्या मनाने गाडीत येऊन बसलो आणि घराकडे निघालो. माझी नुसती अस्वस्थताच नाहीशी झाली नव्हती; तर तोपर्यंत न पडलेल्या कित्येक प्रश्नांची उत्तरं मिळाल्याची जाणीव मला झाली होती.

                पहाटे मला गाभा-यात देवी का दिसली नाही? तिने निघताना मला कसं काय दर्शन दिलं? आजीबाईंच्या नेटक्या हिरव्या साडीमागचं रहस्य काय? त्यांना नक्की कसली चिंता बोलकं करत होती? कुणाची तरी चाहूल लागताच त्या लगबगीनं मंदिराकडे का गेल्या? या प्रश्नांमध्ये 'त्या आजीबाई कोण होत्या?' या प्रश्नाचं उत्तर लपलेलं होतं. त्यांना रोज रात्री भेटायला येणारे विठू आणि साई हे पंढरपूर आणि शिर्डीचे होते, हे कोडंही आता उलगडलं होतं.

                एका अलौकिक समाधानाचा प्रत्यय मला जरी त्यावेळी येत होता; तरी एक खंतही जाणवत होती. आपण देवस्थानांकडे आज नक्की कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो? गाभा-यामध्ये खरोखरंच देवाने वास्तव्य करावं, इतकी प्रसन्नता असते का? 'देवावर श्रद्धा आणि त्याच्या अस्तित्त्वावर विश्वास ठेवतो', असं म्हणणारे किती जण देवाचं पावित्र्य जपतात? आपल्या आयुष्यात आदर्श जगतात?

                हे मला पडलेले प्रश्न आहेत; नव्हे... महालक्ष्मीने जाणीवपूर्वक विचारले आहेत. शोधुया सगळे मिळून त्यांची उत्तरं???

Wednesday, February 9, 2011

जगून तर पाहू...!!!

"कॉलेजची दोन वर्ष सरली... इतकं टापलंय तिला. एकदा विचारुया का सरळ!!!", हे आणि असले विचार प्रत्येक कॉलेजकुमाराच्या मनात कधी ना कधी येतातच. पुष्कळवेळा ते सत्यात उतरवण्यासाठी अतोनात धडपडही केली जाते. बऱ्याचदा ते तसे उतरतात; कित्येकदा नाही उतरत! वेगवेगळ्या वयात, समाजात, संस्कृतीत, परिस्थितीत अथवा मनस्थितीत असे बरेच मोह आपल्याला होत असतात. ...!!! 'मोह'... आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा कशाही बद्दल वाटणारं आकर्षण! काही मोह इतके मोहक असतात की, आपल्याला प्रयत्न केल्याशिवाय राहवत नाही. काही मात्र नुसतेच, दुरून डोंगर साजरे असतात. आता 'मोह' नेहमीच वाईट का? तर, कदाचित तसं नसावं. म्हणजे, मोह नक्की कसला होतो? आणि त्या मोहापायी आपण नक्की काय प्रयत्न करतो, यावर ते अवलंबून असणार.

सकाळी उठून धावपळ करून तीच नेहमीची आठ-चौदाची लोकल पकडायची; खाजवलेली पाठ नक्की आपलीच होती का आणि ती आपणच खाजवली का, हे ही समजू नये, एवढ्या गर्दीतून रोज ऑफिसपर्यंतचा प्रवास करायचा; दिवसभर मानेवर खडा ठेवून काम करायचं; बायकोनं दिलेला डबा रोज ठरलेल्या वेळी खायचा, भाजी टाकायची नाही; संध्याकाळी कितीही इच्छा नसली, तरी पुन्हा तेवढ्याच गर्दीच्या हवाली स्वत:ला करून देत घरी यायचं; अंगात त्राण उरलेले नसल्यामुळे कोणताही गोंगाट सहन होत नसूनही समोर सुरु असलेली 'डेली सोप' मुकाट गिळायची आणि अकरा-साडे अकराला स्वत:ला दिवाणावर झोकून द्यायचं.... वर्षानुवर्ष असंच करत राहिल्यावर एखाद दिवस झाला कामाच्या दिवशी घरी पडून राहण्याचा मोह, तर तो बेजबाबदारपणा ठरू शकतो का?

ऑफिसमध्ये दररोज मरमर काम करायचं; दिवसाच्या शेवटी एखादी 'थँक्यू'ची ई-मेल आणि वर्षाच्या शेवटी एखादं प्रमोशन एवढीच अपेक्षा मनात बाळगायची; दिवसभर काहीही काम न करणा-या शेजारच्या मिश्राच काम शेवटी आपणच जबाबदारी ओळखून हसत हसत करून द्यायचं; आदल्या दिवशी जास्तीची दाऊ पिऊन अचानक तब्ब्येत बिघडलेल्या त्याच्या सुट्टीमुळे आपलं, मुलीला, शाळेच्या गेदरिंगला येतो, म्हणून दिलेलं वचन अचानक मोडायचं आणि वर्षाच्या शेवटी त्याच मिश्राला प्रमोशन मिळालेलं पाहूनही त्राग्यापलीकडे आपण काहीच करायचं नाही.... कायमच्या या वैतागाला कंटाळून महिनाभर नोकरी सोडून घरच्यांबरोबर राहण्याचा मोह झालाच, तर त्याला निष्काळजीपणा म्हणावा का?

कॉलनीमधल्या छोट्या पोरांना पाहून झाला एखाद दिवस क्रिकेट खेळण्याचा मोह; सोपा बॉल येताना पाहून झाला त्याला लगावून देण्याचा मोह; त्याने आपल्याच शेजारच्यांच्या खिडक्यांचा वेध घेतलेला पाहून झाला पळून जाण्याचा मोह; तर चुकलं कुठे? एखाद दिवस हो... एखाद दिवस... फक्त! 'लोक काय म्हणतील!' या धृवपदाखाली आपण आयुष्यातले कित्येक क्षण वाया घालवत असतो. आजूबाजूचं कुणीतरी पाहील म्हणून आपण गाडीवरची पाव भाजी टाळतो; 'काय वाटेल तिला!', म्हणत लाडक्या मैत्रिणीला जेवायला घेऊन जाण्याचा विचार आपण गुंडाळून ठेवतो; संदीप खरेच्या कवितांना चारचौघांत उत्स्फूर्त दाद द्यायची म्हटलं, तर 'म्यानर्स' आडवे येतात; मनापासून आवडत असली, तरी वय आठवून 'फ्रूटी' पिणं आपल्याला पटत नाही... खरंतर हे आणि असे बरेच मोह आपल्याला वेळोवेळी होत असतात. पण आपण त्यांना बळी पडत नाही.

सिगरेटचा एखादा झुरका किंवा दारूचा एखादा पेग क्षणिक समाधान मिळवून देत असेलही; पण त्या मोहांपेक्षा कित्येक असे मोह आहेत, जे दीर्घकाळ आनंद देऊ शकतात. जसं की आईच्या कुशीत जाऊन विसावणं.... कितीही वय झालं, तरी हे सुख कमी होऊच शकत नाही. एखाद दिवस जुनी सी.डी. आणून टोम आणि जेरीची पकडापकडी पाहा. सी.डी. संपूच नये, असं वाटत राहील. आणि तसं वाटलंच ना, तर आणा आणखी एक सी. डी.! काही मोह आवरू नयेतच! एखाद दिवस उगीच फोन उचलावा, समोर दिसेल तो अनोळखी नंबर फिरवावा आणि एखाद्या 'राँग' व्यक्तीशी चावटपणा करावा.... असेल थोडी आगाऊगिरी... पण कधीतरी काय हरकत आहे? जवळची चार-पाच कुटुंब एकत्र गप्पा मारत बसलेली असताना, येते एकदम हुक्की... घालावी (आपल्याच!) बायकोकडे पाहून शीळ; मारावी लाईन इतरांदेखत... मला सांगा, कधीतरी हे असं वात्रटपणे वागायला काय हरकत आहे? बसावं एखाद्या रविवारी संध्याकाळी बाबांबरोबर पत्ते कुटत... भिकार-सावकारचे डाव कितीही वेळ रंगू शकतात.... अगदी कंटाळा येईपर्यंत.... मांडावेत ते तसे... त्यातही बेभान होता येतं. जळालं एखादं पान तर करावा आरडा-ओरडा... भांडावं बाबांशी! ... काही मोह खरंच टाळू नयेत.

पहिला मुलगा झाल्यावर नाचावसं वाटलंच जर हॉस्पिटलमध्ये... तर कशाला थांबायचं? नाचावं निवांत! भर मीटिंगमध्ये वाटला चहा बशीतून प्यावासा.... तर बिनधास्त प्यावा. स्वत:च्या गाडीतून जाण्याऐवजी वाटलं लाल डब्यानी जावंसं; शेवटच्या रांगेत बसून वाटलं खिडकीतून डोकं बाहेर काढावसं; तर सूचना वाचत बसू नये. एखाद्याचं लिखाण वाचून वाटल्या शिव्या घालाव्याश्या, तर त्या घालाव्यात! असले मोह आनंद देणारे असतात. त्यांना बगल देऊ नये!

कसं आहे ना... वेळ ही अशी गोष्ट आहे की, ती कधी थांबत नाही आणि कुणाला थांबूही देत नाही. पण आपण त्या घड्याळाच्या काट्याबरोबर धावता धावता थोडं 'जगलं'ही पाहिजे. वेळ निघून गेल्यावर, आनंद न उपभोगाल्याच दु:ख पश्चात्तापाशिवाय काहीच देत नाही. आयुष्याच्या शेवटी आपल्याच आयुष्याचा अलबम डोळ्यांखालून घालताना, असं नको वाटायला की, 'खूप काही मिळवलं खरं; पण जगायचंच राहून गेलं; मिळवलेलं उपभोगायचं राहून गेलं!'. ... पटतंय ना? ... खरं सांगा, पटतंय ना? ... अहो! मग करा की तसं मान्य... वागा की तसं... द्या बरं टाळी... :-)

Friday, January 14, 2011

जरा याद करो कुर्बानी....

माझा मित्र अमित मनोहर याने माकारासंक्रांतीच्या शुभेच्छा देताना २५० वर्षांपूर्वी याच दिवशी झालेल्या पानिपतच्या तुंबळ युद्धाची आठवण करून दिली. त्याच्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून वाहिलेली ही आदरांजली... लांबलचक असली, तरी कृपया तीत सामील व्हा...


भारतीय संस्कृतीशी निगडीत असलेल्या कित्येक सणांपैकी 'मकरसंक्रांत' हा एक! नोंद करून घेण्यासारखी गोष्ट ही आहे की, इतर सण हे तिथी (हिंदू कालगणने) नुसार साजरे होतात; पण 'संक्रांत' ही तारखे (जागतिक कालगणने) नुसार साजरी केली जाते. खरं पाहता, 'संक्रांत' हा फक्त भारतीय संस्कृतीशी निगडीत सणच नाही. दक्षिण अमेरिकेतील अतिप्राचीन मायन संस्कृतीतही सूर्याच्या मकर राशीत होणाऱ्या संक्रमणाला महत्त्व दिलं गेलेलं दिसून येतं. बाकी, लावणी - पेरणी - कापणी करणा-या शेतकऱ्याचा वर्षभराच्या मेहनतीनंतर उगवलेलं धान्य गोळा करण्याचा त्याचा हा दिवस!

या सगळ्या बरोबरच यंदाच्या संक्रांतीला ऐतिहासिक महत्त्वही आहे. मराठी भाषेत 'संक्रांत ओढवली' अथवा 'संक्रांत कोसळली' अशा आशयाच्या शब्दप्रयोगांचा जन्म होऊन आज २५० वर्षे पूर्ण झाली. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपताच्या युद्धभूमीवर मराठ्यांनी पराभव पत्करला आणि अटकेपार पसरलेलं मराठा साम्राज्य, दिल्लीचं राजकीय तक्ख्त आणि अखंड भारताच्या अस्मितेवरच 'संक्रांत ओढवली'. पानिपताच्या रणभूमीवरचं ते युद्ध ही एखादी किरकोळ घटना नसून अखंड इतिहास होता.

या युद्धाची पार्श्वभूमी, संबंधित प्रत्येक घटना, निगडीत प्रत्येक व्यक्ती, खेळल्या गेलेल्या चाली, त्यांचे दूरगामी परिणाम आणि युद्धाचा निकाल हे सर्वच कांगोरे अतिशय आश्चर्यकारक आणि रोमांचकारी आहेत. महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष आमने-सामने उभ्या ठाकलेल्या दोनही बाजूंमध्ये परस्पर वैर असण्याचं काही कारणच नव्हतं. कोण्या नजीब खानाच्या सत्तेच्या हव्यासापायी अफगाण सेनानी अहमद शहा अब्दाली हिंदुकुश रांगा पार करून दिल्ली वर चाल करून आला. आणि इतर कोणीही त्याला दोन हात करायला समर्थ नसल्यामुळे दिल्लीला 'राजधानी' आणि अब्दालीला 'राष्ट्रसंकट' मानून पुण्याहून मराठे त्याच्या प्रतिकारासाठी उत्तरेला पोहोचले. एक प्रकारे हे युद्ध 'धर्म विरुद्ध राष्ट्र' असंही व्यक्त करता येईल.

भगव्या ध्वजाच्या अधिपत्याखाली या युद्धात मराठ्यांनी शौर्य गाजवलं खरं; पण अब्दालीच्या कपटाला ते पुरून उरलं नाही. कदाचित छत्रपतींच्या गनीमी काव्याचे पुरेसे धडे स्वाभिमानी पेशव्यांनी गिरवलेच नव्हते. त्यांना सामील झालेले सरदार हे निव्वळ देशभक्ती आणि मराठ्यांवर असलेली त्यांची निष्ठा या बाबींवर एकत्र आले होते. काही तर निव्वळ धाकामुळेही आले होते. त्यामुळे अब्दाली सारख्या मुरब्बी राजकारण्याचे डावपेच समजण्यास हे इतर सरदार असमर्थ होते. अधिक, त्यांचा स्वाभिमानही वेळोवेळी घातक ठरतंच होता. एवढंच कशाला, मोहिमेवर कूच करण्यापूर्वीची खुद्द शनिवारवाड्यातली खलबतंही स्वार्थ आणि घमेंडीने बरबटलेली होती. अटकेपार पराक्रम गाजवणारे राघोबादादा, पत्नी आनंदीबाईच्या शब्दांत गुरफटले. अब्दालीशी दोन हात करण्यासाठी अवास्तव फौज आणि अमाप पगार त्यांनी मागितला. अखेर नानासाहेबांना पेशव्यांचे दीवाण असलेल्या सदाशिव राव भाऊ आणि त्यांच्या दिमतीला कोवळा विश्वासराव पाठवावा लागला. युद्धात न उतरणा-या राघोबादादांमुळे अब्दालीच्या विजयाला एक प्रकारे सुरुवातच झाली होती.

पेशव्यांच्या मोहिमेची आखणीही जेमतेमच होती. गंमत म्हणजे, उत्तरेची मोहीम असल्यामुळे काशीयात्रा होईल, या कल्पनेने महाराष्ट्रातून बायका - पोरांसह कुटुंबच्या कुटुंब सोबतीला होती. सैन्यापेक्षा ही पिलावळ सांभाळणं जिकिरीचं काम होत होतं. थोडक्यात, युद्धावर निघालेल्या सैन्याइतकंच काशीयात्रेला निघालेल्या संप्रदायाचं स्वरूप त्या चळवळीला आलं होतं. या काफिल्याच्या राहण्या-खाण्याची सोय वाटेत लागणा-या गावांकडून अपेक्षित होती. त्यामुळे, काही ठिकाणी मराठी सैन्याचा जसा यथायोग्य पाहुणचार झाला, तशीच काही ठिकाणी आबाळही झाली. शिवाय मुला-माणसांबरोबर हत्ती, घोडे, गाय-बैल असा समुदायही होताच. सुमारे एक लक्ष सैन्य आणि तीस हजारांहून अधिक प्राणीवर्ग एवढा लवाजमा घेऊन पेशवे दिल्लीच्या दिशेने निघाले होते. चंबळचं खोरं आणि त्या पुढचा भूप्रदेशही मराठी सैन्याला नवखा होता. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आणि त्यांच्याशी झुंजण्यासाठी आवश्यक माहिती मराठ्यांकडे नव्हतीच!

याउलट जीवाच्या भीतीने स्थानिक अब्दालीच्या फौजांना, वाटेत, उत्तम पाहुणचार देत होते. जिथे तो मिळत नव्हता, तिथे तो लुबाडून मिळवण्याइतक्या अफगाण फौजा क्रूर नक्कीच होत्या. पोटातल्या भुकेपासून सर्व प्रकारच्या शारीरिक भुका भागवत दुराणी फौजा दिल्लीच्या दिशेने निघाल्या होत्या. वाटेत लहान-मोठे सरदार आपापल्या तुकड्यांसह येऊन त्यांना सामील होत होते. समृद्धीला कुठे तुटवडाच नव्हता.

इकडे, पंजाब प्रांतात कुंजपु-यापर्यंतचा प्रदेश अंमलात आणून मराठी सैन्याने दिल्लीच्या दिशेने मोर्चा वळवला. भर पावसाळ्यात वाट तुडवणं मराठी सैन्यासाठी त्रासदायक ठरत होतं. पावसाळा ओसरल्यावरही उत्तरेच्या नद्या दुथडी भरून बाहत होत्या. पंजाब जिंकून अब्दाली पाठीशी येऊन पोहोचल्याची वार्ता मिळाल्यावर मात्र भाऊ थबकले. त्यातच पुण्याहून युद्ध लवकरात लवकर उरकण्याचे सूचना वजा आदेश भाऊवरचा ताण वाढवत होते. अखेर अब्दालीला दिल्लीच्या वाटेवरच अडवण्याचा निश्चय करून भाऊंनी सोनपत - पानपतचा प्रदेश निवडला. भाऊंची ही चाल अब्दालीच्या चांगलीच पत्थ्यावर पडली. दक्षिणेला यमुनेच विस्तृत खोरं, पूर्वेकडे नजीब आणि शुजा उद्दौलाच सैन्य आणि पश्चिमेकडून खुद्द अहमद शहा अब्दाली अशा कात्रीत मराठी सैन्य सापडलं. आणि १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपताच्या त्या रणभूमीवर तुंबळ युद्ध सुरू झालं.

पराक्रमी पेशव्यांचा हल्ला दुराणी तोफांना नामोहरम करू लागला. इब्राहीम खान गारद्याच्या लांब पल्ल्याच्या शंभरांहून अधिक तोफा शत्रूला अक्षरश: भाजून काढत होत्या. नागपूरकर भोसल्यांच्या सहाय्याने पेशव्यांच्या तुकड्या अफगाण फौजेच्या नाकी दम आणत होत्या. मध्यान्हीच्या आसपासच अब्दालीच्या फौजांना आपला पराभव जाणवू लागला होता. पूर्वेला बडोद्याच्या गायकवाडांच्या आणि इंदूरकर होळकरांच्या तुकड्या शुजाशी लढा देत होत्या. ग्वाल्हेरचे शिंदे नजीब खानाच्या रोहिल्यांना घायाळ करत होते. नजीबाची भूतकाळातली फितुरी आणि आजच्या युद्धातला बचावात्मक पवित्रा शिंद्यांना आणखी हिंस्र बनवत होता. जिंकण्याची ईर्ष्या त्यांना आणि पर्यायाने गायकवाड-होळकरांना मुघल सैन्यात खोलवर घेऊन गेली आणि युद्धाचं पारडं फिरण्यास इथेच सुरुवात झाली.

शिंदे-होळकर घेरले गेले. तिकडे, गारद्याच्या प्रभावी परंतू अवजड तोफा हलवणे मुश्कील होत चालले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सदाशिव राव भाउंनी आणि विश्वासरावांनी स्वत:ला युद्धात झोकून दिले. ते पाहाताच अब्दालीने आपल्या नव्या दमाच्या फौजा रणांगणात उतरवल्या आणि भाऊ तथा विश्वास मारले गेल्याची अफवा मराठा सैन्यात उठवून दिली. आधीच थकलेल्या मराठी सैन्याने ही बातमी ऐकून धीर सोडला. हातातली शस्त्र टाकून पराक्रमी सैन्याने पळ काढला. त्यामुळे चेव चढलेल्या दुराणी-मुघलांनी एकेक मावळा कापून काढला. भाऊ त्या धुमश्चक्रीत बेपत्ता झाले; तर विश्वासाराव मारले गेले. कित्येक महिन्यांची मेहनत काही तासांत वाया गेली आणि मराठी साम्राज्य, हिंदुस्थानी तख्त तथा देशाची एकात्मता यांवर संक्रांत कोसळली.

जरी हा पराभव जिव्हारी लागणारा असला, तरी हा इतिहास बोलका आहे... खूप काही सांगून जाणारा आहे. नफा-तोट्याचा हिशेब मांडायचा झालाच, तर अमाप तोटा आणि माफक नफाही त्यातून हाती लागतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अखंड हिंदुस्थान एका ध्वजाखाली एकत्र आला होता. त्या आधीच्या कित्येक शतकांत असं घडलं नव्हतं! काहीही संबंध नसताना पेशवे पुण्याहून निव्वळ राष्ट्र-संरक्षणासाठी दिल्लीच्या मदतीला धावले ... महाराष्ट्राच्या घराघरातून बाल-तरुण-वृद्ध या मोहिमेवर गेले... त्यांनी आपल्या छात्यांचे कोट केले... प्राणांच्या आहुती दिल्या... मोहिमेवर जाताना वाटेत कोणतेही अत्याचार केले नाहीत. आपापसातले वाद-विवाद विसरून अथवा तात्पुरते बाजूला ठेवून शत्रूशी प्रतिकार केला...

इतिहासकारांच्या मते यमुनेच्या काठी अब्दालीची वाट पाहणारं मराठा सैन्य बारा किलोमीटर लांब पसरलं होतं. घरा-घरातून त्या रणभूमीवर लढायला गेलेली ही राष्ट्रनिष्ठा नक्कीच बरंच काही देऊन जाणारी आहे. आणि हे युद्ध इतकं घनघोर होतं की, मराठ्यांनी सत्तर हजारांहून अधिक सैन्य गमावलं खरं; पण अब्दालीला त्यानंतर पुन्हा तो भारतात येऊनही जिंकण्याची ताकद शिल्लक ठेवली नाही. संस्कृती आणि देशाच्या बचावासाठी धावून गेलेल्या त्या विविध जाती-पंथ-धर्मातील लोकांना आज आपण आदरांजली वाहूया.

इथे आदरांजली म्हणजे मौन किंवा अश्रूंची अपेक्षा नाही; तर त्याच संस्कृतीचे आणि त्याच राष्ट्राचे घटक म्हणून आपणही आपल्यातल्या जाती-पंथ-धर्मांना तिलांजली देऊन एकत्र येऊया. आपल्याला युद्ध करण्याची गरज नाही किंवा प्राणांची आहुती देण्याचीही नाही; पण देशाची एकात्मता आणि अस्मिता अबाधित राखण्यासाठी आपण एकसंध तरी राहू शकतो!!!

- शेखर श. धूपकर