Wednesday, October 20, 2010

टकलावर (न) रुळणारी शेंडी...

भारतीय शिक्षणव्यवस्था ही जगातल्या आर्थिक महासत्तांपेक्षा किंचित सक्षम मानली जाते. खरंतर, ही सक्षमता ब-यापैकी परीक्षापद्धती आणि अभ्यासक्रमावर अवलंबून असते. अव्वाच्या सव्वा अभ्यासक्रम आणि पाठांतराभिमुख परीक्षापद्धती ही भारतीय शिक्षणव्यवस्थेची दोन मूलभूत अंग आहेत. काहीही असो... या शिक्षणव्यवस्थेतून (देशा) बाहेर पडणारे विद्यार्थी तद्देशीय विद्यार्थ्यांपेक्षा वरचढ ठरतात खरे!

तर अशा या व्यवस्थेला कायम सक्षम ठेवण्यासाठी दर ठराविक वर्षांनी अभ्यासक्रम बदलण्यात येतो. ही नक्कीच एक प्रभावी उपाययोजना आहे. हे बदल सामान्यात: जागतिकीकरणावर अवलंबून असतात. पण विचार करा, जागतिकीकरणाचा 'इतिहासा'सारख्या विषयावर कोणता परिणाम होत असेल! जे घडून गेलं, तो इतिहास...

पण नुकताच शालेय अभ्यासक्रमातला 'इतिहास बदलला' गेला... अगदी शब्दश:! छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांना इतिहासातून 'वगळण्यात' आलं. ज्या समर्थ रामदासांनी महाराजांना 'जाणता राजा' म्हणून उल्लेखलं, त्या समर्थांनी महाराजांना शिकवण दिल्याचं आपल्या वर्तमान 'इतिहासा'नं नाकारलं.

वस्तुत: 'इतिहासा'त बदल घडवले जातातही; पण ते पुराव्यांच्या आधारे! पूरक पुरावे उपलब्ध होईपर्यंत आपण हा इतिहास नाकारणं सयुक्तिक होणार नाही. उलट, आपल्याकडे इतिहासातले हे बदल जातींच्या आधारावर घडवले जाऊ लागले आहेत. दादोजी आणि समर्थ हे जातीने ब्राह्मण असल्यामुळे त्यांचा 'मराठा-सम्राट' शिवाजी महाराजांशी संबंध तोडण्यात आला. अरबी समुद्रामध्ये उभारल्या जात असलेल्या महाराजांच्या भव्य पुतळ्यापासून त्यांच्या या दैवतांची चित्रे दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

वस्तुत: ही उदाहरणे ब्राह्मण समाजाबद्दल असलेल्या तिरस्काराचं प्रतिनिधित्व करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या तिरस्काराचं मूळही इतिहासातच आहे. ब्राह्मणांनी वर्षानुवर्षे आपल्या बुद्धिमत्तेचा अवास्तव बडेजाव करत अन्य जातीतील लोकांना हीनदर्जाची वागणूक दिली. त्याचा वचपा आज काढला जातोय!

बरं! हा वचपा काढणारेही आजच्याच पिढीतले आहेत; आणि सहन करणारेही आजच्याच पिढीतले! म्हणजे, आजचा ब्राह्मण खालच्या जातीतील त्याच्या मित्राला घरात प्रवेश नाकारतही नाही; किंवा तो मित्रही ब्राह्मणाबरोबर जेवताना कोणतीही अवघडलेली मन:स्थिती अनुभवत नाही. मग बदला कसला? कोणी घ्यायचा? आणि का?

'ब्रह्म' जाणतो तो 'ब्राह्मण'! थोडक्यात, कोणताही ज्ञानी पुरुष हा 'ब्राह्मण' म्हणवला जाऊ शकतो. म्हणजेच, ब्राह्मण्य हे वारसा हक्कानेच मिळतं, असं नाही; तर तो इच्छा-शक्तीचा आणि प्रयत्नांचा भाग आहे. गळ्यात जानवं, डोक्यावर शेंडी, सकाळ-संध्याकाळी गायत्री मंत्राचा जप, ओठांवर संस्कृत सुभाषितांचा निवास, आहारामध्ये शुद्ध शाकाहारी घटक हीच जर ब्राह्मण्याची ओळख असेल; तर ही जातच आज अस्तित्वात नाही.

आणि, आडनावांमुळे ब्राह्मण झालेल्यांवर आज अन्याय आणि अत्याचार होणार असतील, तर समस्त ब्राह्मणसमाजाला त्याचं कसलंही सोयर-सूतक नाही. मुळात, ब्राह्मण हा आक्रमक नाहीच! त्याची ताकद त्याच्या मनगटात नसून, मेंदू हाच त्याचा एकमेव बळकट स्नायू आहे. ब्राह्मण मार खाईल, रडेल; पण तो कुणावरही हात उगारणार नाही. संमेलनात अथवा सभेत दोषारोपण करण्याची हुक्की आलीच, तर तो अन्य ब्राह्मणांनाच शब्दांचा मार देईल. कारण, आक्रमण आणि प्रतिकार असले शब्द त्याच्या हृदयाला भिडतच नाहीत.

गांधीहत्येनंतर ब्रह्मणांचीही कत्तल झालीच की; पण म्हणून त्याने कधी शस्त्र उचलले नाही; किंवा प्रतिकार केला नाही. अर्थात, पराक्रमी पेशव्यांचा अपवाद आपल्याला इथे वगळावा लागेल. त्यांनी शस्त्र उचलली खरी; पण पराक्रम गाजवला तो परकीय शत्रुंच्या विरोधात! पुढे, शालेय अभ्यासक्रमात असो अथवा सरकारी नोकरीमध्ये असो, कधी राखीव जागांची मागणी ब्राह्मणाने केली नाही. तो मूग गिळून गप्प राहिला. आजही तो गप्पच आहे आणि उद्याही तो गप्पच राहील.

आठ्याणव टक्के गुण मिळवूनही माझ्या मुलाला मनाजोगत्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, याचं दु:ख करून घेतो, तो ब्राह्मण; पण जेमतेम उत्तीर्ण होऊनही हवा तिथे प्रवेश मिळवणा-या त्याच्या मित्राबद्दल त्याला असूया कधी वाटतच नाही. राखीव जागांच्या मुद्द्यांवरून पेटलेला देश पाहताना घरात लपून हळहळ व्यक्त करतो, तो ब्राह्मण; पण सरतेशेवटी त्याच्याच वाटच्या जागा आणखी कमी झाल्यावरही तो खचून जात नाही.

सदसद्विवेकाला पटलं, म्हणून ब्राह्मणाने शाकाहाराची बंधनं झुगारून दिली. लौकिकार्थाने काहीच महत्त्व न राहिल्यामुळे गळ्यातून जानवंही काढून ठेवलं. शेंडी हा तर कदाचित त्याच्याही विनोदाचाच भाग असेल. हा सर्व त्याग करूनही ब्राह्मणाने काहीच गमावलं नाही. पाणी नाका-तोंडाशी आल्यामुळे उद्या तो देशही सोडेल! सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ब्राह्मण्य म्हणजे ज्ञान... ज्ञान ही एक उर्जा आहे... आणि उर्जा म्हटलं की तिचा अंत अशक्य आहे. अर्थात ती रूप बदलते... ब्राह्मण देश बदलेल!

खरंतर हे सर्व विचार अशा प्रकारे मांडताना कुठलाही आनंद मला होत नाही; किंवा कसलीही प्रौढी गाजवण्याचा माझा उद्देश नाही. पण हे विचार एकांगी नसून त्यांवर विचार आवश्यक आहे; म्हणून ते मांडण्याचा हा अट्टाहास! अन्यथा 'भारत' हा लवकरच एका जबरदस्त उर्जेला गमावून बसेल आणि अन्य देशांत स्थाईक झालेले ब्राह्मण आपल्या मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास रंगवून रंगवून सांगतील... अत्यंत 'पवित्र' हेतूने!!!

Tuesday, October 19, 2010

थोबाडपुस्तक

परवाच्या रविवारी दुपारी निवांत वेळ होता; म्हणून 'थोबाडपुस्तक' उघडलं आणि...
अरे! दचकलात ना?
हम्म्म्म... सहाजिक आहे.
'थोबाडपुस्तक' हा नेहमीसारखा शुद्ध आणि पारंपारिक मराठीत बोलायचा विषयच नाही; तर तो बोली मराठीत मांडण्याचा एक 'टॉपिक' आहे.

... तर ... परवाच्या 'सन्डे आफ्टरनून 'ला 'टाईमपास' म्हणून 'फेसबुक'(!!!) 'लॉगिन' केलं आणि 'वॉल' वरचे 'पोस्ट्स' बघत बसलो होतो. त्यापैकी काहींवर मी माझ्या (उपरोधक) 'कमेंट्स' टाकल्या, तर काही 'लाईक' केल्या. वास्तविक माझ्या 'फ्रेंड्सलिस्ट' मध्ये अडीचशे जण 'एडेड' आहेत. त्यामुळे 'फेसबुक'वर 'आक्टिव' रहायला मला पुरेशी कारणं 'अव्हेलेबल' असतात. नाही; कसंय... 'फेसबुक' हा जेवढा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तेवढाच तो करमणुकीचाही आहे.
उदाहरणार्थ, श्रीकांतने काल 'आय एम बोअर्ड' असं जाहीर केलं. आता यात मितालीला आवडण्यासारखं काय होतं कुणास ठाऊक; पण तिला ते 'लाईक' झालं खरं!

'फेसबुक'चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाची हालचाल... माफ करा... 'आक्टिविटी' अगदी तारीख-वेळेसकट नोंदवली जाते. त्यामुळे, दोन वर्षांची लहान मुलगी असणा-या कमलेशने त्याचं स्व:चं 'प्रोफाईल' दहा तासांपूर्वी जेव्हा 'अप(टु)डेट' केलं, तेव्हा मला आलेलं 'नोटीफिकेशन' काहीसं असं होतं...
Kamlesh is married.
10 hours ago
माझं हसून हसून पोट दुखण्याची वेळ आली होती.

माझं हसून होतं न होतं, तेवढ्यात मला एक 'पिंग' आला. उजव्याबाजुच्या 'कॉर्नर'मध्ये एक 'पॉपप' दिसायला लागला. क्षमा नावाच्या माझ्या शाळेतल्या वर्गमैत्रिणीने मला 'ऑनलाईन' पाहून 'च्याट' करण्यासाठी 'हाय' केलं होतं. आता..., हा 'फेसबुक'चा खराखुरा फायदा आहे. इतर कोणत्याही प्रकारे संपर्कात नसलेल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना शोधून काढण्याचं खात्रीलायक साधन म्हणजे 'फेसबुक'!
... तर, क्षमाच्या 'हाय'ला मीही पटकन 'हेलो'ने 'रिप्लाय' दिला. इथे क्षमाने आपलं 'डिस्प्ले नेम' 'क्षमा... To forgive' असं ठेवलं होतं, ही नमूद करण्यासारखी गोष्ट आहे.
'हाय-हेलो' नंतर रंगलेलं आमचं संभाषण काहीसं अशा प्रकारचं होतं...
क्षमा : वॉंत्सप???
मी : नथिंग स्पेशल. तू सांग.
क्षमा : सेम हिअर. टी.व्ही., 'फेसबुक' आणि थोडंफार 'कुकिंग' यातच फार 'बिझी' असते रे.
मी : चांगलंय! एकंदरीत तुझं चांगलं चाललंय!
(या माझ्या खोचक शे-यावर तिनं नुसताच एक 'स्माईली' पाठवला.)
मी : मग? शाळेतल्या इतर कोणाशी 'टच'मधे आहेस का?
क्षमा : हो. स्वाती, प्रणिता, अमित, प्रकाश आणि कोण-कोण आहेत माझ्या 'फ्रेंड्सलिस्ट'मधे. 'हाय-हेलो' होतच असतं.
मी : गुड...
क्षमा : वॉट एल्स? अमेरिका काय म्हणते?
मी : अमेरिका ठीक. सध्या थंडी पडायला लागलीये.
क्षमा : चल! यु आर सो नॉटी!!!
मी : (गप्प)!!!
(हे वाचून मी त्या थंडीपेक्षाही गार पडलो. काय 'रिप्लाय' द्यावा, हेच मला सुचत नव्हतं! एवढ्यात तिचाच खुलासा आला...)
क्षमा : सॉरी! राँग विंडो!
(अजूनही माझा अडकलेला अवंढा गळ्यातच होता. म्हणजे, ही बया इतर कोणाशीतरी (अ)'च्याट' करत होती.
पण म्हणून, 'त्या'चा चावटपणा + हिची चूक = मी नॉटी???)
क्षमा : अरे! निक ऑफिसमधून 'च्याट' करतोय.
(त्या तशा थंडीत आलेला घाम मी पुसून घेतला. तिच्या या वाक्याने मला जरा धीर आला. क्षमाचा नवरा निखील उर्फ निक त्याच्या ऑफिसमधून स्वत:च्या बायकोशी उगीचच चावटपणा करत होता.
आणि क्षमाच्या अनावधानाने मी 'नॉटी' ठरलो होतो.)
मी : ओ.के. कसा आहे निखिल?
क्षमा : एकदम फाईन!
(मी खरंतर इथेही 'नॉटी' याच उत्तराची अपेक्षा बाळगून होतो.)
आज त्याला रविवारचं ऑफिसला जावं लागलं. सो, आम्ही 'फेसबुक' वर 'टाईमपास' करतोय.
मी : ओह! कूल.
(मी अजूनही स्वत:ला च 'कूल' करण्यात मग्न होतो!)
क्षमा : बायदवे, तू व्हेगास ट्रीप केलीस का रे?
मी : नाही अजून.
क्षमा : अरे! जाऊन ये मग. 'बिंगो' नावाच्या तिथल्या कसिनोची 'ब्रांच' सद्ध्या पुण्यात उघडलीये. मस्त आहे.
(म्हणजे, पाश्चात्य संस्कृतीच्या असल्या 'फांद्या' आता आपल्याकडेही फोफावाताहेत. आणि त्यांचं गुणवर्णन मी इथे राहून ऐकतो आहे!)
मी : ओ.के.
क्षमा : बी.आर.बी.
(असं म्हणून क्षमा 'आयडल' झाली. इथे, 'बी. आर. बी.' चा फुल फॉर्म 'बी राईट ब्याक' असा असून 'आलेच हं!' इतका सोज्ज्वळ आहे, याची अज्ञानी वाचकांनी नोंद घ्यावी.)
.....
(सुमारे दहा मिनिटांनी क्षमा जी आली, तीच 'सी या' करायला!)
क्षमा : चाओं! सासुबाईना 'कुकिंग'मधे मदत हवी आहे. जाना पडेगा. टी.टी.एल.वाय!
मग, मीही 'शुअर' म्हणत तिला 'बा-बाय' केला.
इथे, 'टी.टी.एल.वाय' चा फुल फॉर्म 'तॉंक तु यु लेतर' असा आहे, हे सूज्ञांना सांगणे न लगे!

आमच्या दोघांच्या या संभाषणावरून हे सहज दिसून येतं की, 'फेसबुक'ची अशी स्वत:ची भाषा आहे. ती निव्वळ मराठी नाही, इंग्रजी नाही किंवा इतर कुठलीही नाही.
पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे 'फेसबुक' हे आता जीवनच होऊ लागलंय. 'फार्मविल'मधे शेती करून फावल्या वेळात ऑफिसचं काम(ही) करणारे पुष्कळ शेतकरी(!) मला ठाऊक आहेत.
जोडधंदा म्हणून 'कोफी-हाऊस' चालवून 'हौस' भागवणारे कित्येक महाभाग माझे मित्र आहेत. शरीराच्या कोणत्या भागावर तीळ आहे, यावरून तुमचाच स्वभाव ओळखणारे (वात्रट) ज्तोतिशी आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेतच की!

या आणि अशा अनेक प्रकारांनी या 'फेसबुक'ने आपल्या पारंपारिक जीवनावर चांगलाच परिणाम केलाय. 'कब्जा मिळवलाय' हा कदाचित 'पर्फेक्ट' वाक्प्रचार ठरेल.
आता हेच पहा ना... नेहमी प्रमाणेच हा ही लेख शुद्ध मराठीत लिहिण्याची माझी मनापासून इच्छा होती. पण 'फेसबुक'चं भाषांतर 'थोबाडपुस्तक' केल्यावर माझी मीच माघार घेतली आणि हा लेख जमून आला...