Thursday, December 10, 2009

आटपाटनगराची गोष्ट

सूचना: सदर कथेतील घटना तथा घटनाक्रम निव्वळ काल्पनिक असून त्यांचा वस्तुस्थितीशी काडीचाही संबंध नाही... आणि तो लावण्याचा प्रयत्नही केला जाऊ नये.

नेहमीसारखाच आजही सकाळी वेळेवर उठलो. का कुणास ठाऊक, पण कंपनीच्या बसने जाण्याऐवजी आज स्वत:च्या गाडीने हाफिसात जाण्याची हुक्की मला आली. मग, 'फॉर अ चेंज' म्हणत मी गाड़ी काढली आणि निघालो. वास्तविक माझं घर आणि ऑफिस यांच्यामधे संपूर्ण पुणं वसलेलं आहे. थोडक्यात, पिम्परीतल माझं घर पुण्याच्या पश्चिमेला, तर हडपसरला असलेलं ऑफिस पुण्याच्या पूर्वेला आहे. आता, पुण्यामधे गाडी चालवणं, हे चंद्रावर पाथफ़ाइंडर चालवण्यापेक्षा अवघड आहे, असं मत पुण्यातून चंद्रावर न गेलेला आणि 'पाथफ़ाइंडर' हे नेमकं कसलं 'मॉडल' आहे, हे माहिती नसलेला प्रत्येकजण मांडू शकतो. परंतू, गाडी चालवणं ही आवडीची बाब असल्यामुळे मी अशा मतांचा फारसा पुरस्कर्ता नाही आणि 'पुण्याचा' असल्यामुळे इतरांची मतं मी फारशी ग्राह्याही धरत नाही.

... असो! तर मी राहत्या वसाहतीतून गाडी हमरस्त्यावर आणली आणि काहीतरी चुकत असल्याची जाणीव मला झाली. काय? ... ते कळेना! मी गाडी तशीच पुढे चालवत राहिलो आणि नाशिकफाट्याच्या मुख्य चौकात सिग्नलला येऊन थांबलो.

या वेळेपर्यंत मी फारच बेचैन झालो होतो. काही सुचेनासं झालं होतं... आणि अचानक मला साक्षात्कार झाला की घरून निघाल्यापासून मी एकही होर्न ऐकला नव्हता. पण हे कसं शक्य झालं? म्हणजे... रस्त्यावरचं आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी असलेली सोय म्हणजेच 'होर्न'! ... आणि तो कोणीच वाजवू नये??? मी उगीच माझ्या गाडीचा होर्न वाजवून पाहिला. आजुबाजुच्या चार-पाच वाहनचालकांनी दचकून 'असा काय हा!!!' अशा आविर्भावात माझ्याकडे दृष्टीक्षेप टाकला. त्यांच्याकडे पाहताना मला असं आढळलं की सगळी वाहनं अगदी शिस्तीत, एका रांगेत आणि सुरक्षित अंतर ठेऊन उभी आहेत. रांगेतली पहिली वाहनं रस्त्यावर आखलेल्या पांढ-या पट्ट्यांच्या अगोदर थांबली आहेत. वस्तुत: माझी गाडी त्या पांढ-या रेषेपासून बरीच पुढे उभी होती. अगदीच स्पष्ट सांगायचं, तर गाडी थांबवण्याची मला इच्छाही नव्हती. परंतू चौकात वाहतूक पोलीस उभा असल्याचं लक्षात आल्यावर गाडी थांबवल्यामुळे मी चौकाच्या पुरेसा मधोमध पोहोचलो होतो.


इतक्या वेळात एकाही भिका-याने किंवा त्याच्या पोराने मला तो कालपासून उपाशी असल्याची माहिती पुरवली नव्हती. एका रात्रीत असा काय बरं बदल घडला असावा? ... याच विवंचनेत असताना चौकातील वाहतूक-पोलीस माझ्या दिशेने येताना मला दिसला. मी पटकन पाकिटात लायसंस असल्याची खात्री करून घेतली. तो नसता, तरी त्याच पाकिटातली पन्नासाची नोट लायसंसऐवजी उपयोगी पडते, या प्रमेयाची सिद्धता सर्वज्ञात आहेच! त्यातून मी सिग्नलचा मान राखून गाडी थांबवली होती. मग याची चाल चुकली कशी?

"आपण आपली गाडी कृपा करून त्या रेषेपाठी उभी करण्याची तसदी घ्याल का?"... असलं काहीतरी बोलला तो... आणि मला एक स्मितहास्यही करून दाखवलं. मी त्याला 'सिग्नल सुटतोच आहे!' हे गिरवलेलं उत्तर दिलं. यावर "तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का रे ए... (फुल्या-फुल्या-फुल्या)" असं वरच्या पट्टीतलं अनावश्यक न बोलता त्याने मला पुन्हा एकदा गाडी मागे नेण्याची नम्र विनंती केली.

मला गहिवरून यायचंच शिल्लक राहिलं होतं. मी गाडी मागे घेताच इतर वाहनाचालाकान्नी मला चक्क धन्यवाद दिले!!! ... आता मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली होती. माझा अस्वस्थपणा शिगेला पोहोचला होता. जोरजोरात होर्न वाजवण्यासाठी माझा हात शिवशिवत होता. वाहतूक पोलिसाला पाहून सिग्नल पाळल्याचा मला मनोमन पश्चात्ताप होत होता.

सिग्नलला थांबल्यापासूनच्या काही क्षणांमधे घडलेल्या या घटना मन सुन्न करणा-या होत्या. इतक्या वेळात मला या ही गोष्टीची जाणीव झाली होती की, रस्त्यांवर, कोणाही अनोळखी व्यक्तीला आणखी काही अनोळखी व्यक्तींनी विनाकारण दिलेल्या शुभेच्छांचे फलक नव्हते; कमीत कमी कपडे घालून कपाळावरच्या टिकलीची जाहिरात करणा-या अथवा तत्सम अभिनेत्रींची छायाचित्रे नव्हती; भर रस्त्यात गाडी लावून स्वत: चार पेग 'लावायला' गेलेल्या बेजबाबदार चालकाचे उदाहरण नव्हते किंवा वाहनांना अडथळा करणारे चारचौघांमध्ये सुरु असलेले भांडण नव्हते.

... आता मात्र मला दरदरून घाम फुटला होता. हा बदल कसा झाला, यापेक्षा तो झालाच का?... या प्रश्नाने मी अस्वस्थ झालो होतो. इतक्यात माझ्याच गाडीवर मागच्या बाजूने दुसरी गाडी आदळल्याचा आवाज झाला आणि पाठोपाठ "अबे ए...! अंधा है क्या? सिग्नल दिख नाही रहा है क्या?" सोबत माझ्या आई-वडिलांचा उद्धार कर्णकर्कश होर्न्समधून ऐकायला मिळाला आणि मी भानावर आलो.

इतर प्रगत देशांसारखीच सुबक व्यवस्था आपल्याकडेही असावी, अशी नम्र इच्छा बाळगणारा मी काही क्षण त्या भावाविश्वालाच वस्तुस्थिती समजून बसलो होतो. पण त्या आदर्शवादाला जोरदार दणका बसून मी आता वास्तवात परतलो होतो. एक सुस्कारा सोडून मी गाडी सुरू केली आणि 'फोर अ चेंज' वाहतुकीचे सर्व नियम पाळत ऑफिसला पोहोचलो...

- शेखर श. धूपकर
( Shekhar S Dhupkar )

अबोल बोबडे बोल...

पार्श्वभूमी...

श्वेताचा चिमुकला 'शिव' तीन वर्षांचा झाला आणि त्याच्या शाळेचा पहिला दिवस उगवला. उगवतीबरोबरच हा दिवस श्वेताच्या घरात नाविन्य घेऊन आला. आपल्या चिमुरड्याच्या उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी म्हणून शिवचे आई-बाबाच अतिशय अस्वस्थ झाले होते... कसा असेल पहिला दिवस? रमेल का शिव शाळेत? रडणार तर नाही ना तो? ... या आणि अशा प्रश्नांनी डोक्यात गर्दीच केली होती जणू...

त्याचवेळी उत्सवमूर्ती शिव मात्र एका वेगळ्याच भावविश्वात रमला होता. 'शाळा' म्हणजे नक्की काय? ... हे ठाऊक नसलेला तो आपण शाळेत काय-काय करणार, हे आई-वडिलांना सांगत होता; स्वत:च्याच मनाशी चित्र रेखाटत होता.

सुंदर जीवनाच्या या पहिल्या दिवसासाठी शिवला पूर्णपणे तयार करणा-या श्वेताचं मन मात्र चिंतातूर होत होतं. झटपट निघून गेलेली तीन बर्ष आणि येऊ घातलेल्या प्रकाशमय कालखंडामधेच ती उभी होती त्याक्षणी जणू काही! अशाच मन:स्थितीमध्ये तिघेही शाळेत पोहोचले...

आपल्याच वयाच्या इतर चिमुरड्यांना बघून शिवचा उत्साह आणखीनच वाढला. तो सहज त्या सगळ्यांमध्ये मिसळला. आपली गोष्ट कुणाला ऐकवू लागला; तर इतर कुणाच्या गोष्टी स्वत: ऐकू लागला. आजूबाजूला मांडलेल्या खेळांमध्ये तो सहज रमायला लागला...

आपला हात सहज सोडून धावत गेलेल्या आपल्या चिमुरड्याचं भावविश्व अस्तित्वात येत असल्याचं पाहणा-या त्याच्या आईचं मन मात्र हळवं होत होतं. त्याला आपल्यापासून काहीकाळ दूर ठेवावं लागणार, ही कल्पनाही तिला असह्य होत होती. त्याच्या वर्गशिक्षिका, आपण घेतो तशी, त्याची काळजी घेऊ शकतील का, या प्रश्नाचं पूरक उत्तर काही केल्या श्वेताला मिळत नव्हतं. एक वेगळा अनुभव घेणा-या आपल्या लेकाचा आनंदी चेहरा त्या आईला सुखावत होताच; पण नविन विश्वात धुंद रमलेल्या पोटच्या गोळ्याला असलेली आपली गरज कमी झाली की काय? या वेड्या विचाराने तिची घालमेलही होत होती...

दिवसभर आपल्या आजूबाजूला हुंदडणा-या तिच्या पोराशिवायचे घरातले चार तास श्वेताला चार दिवसांप्रमाणे गेले. पण, त्याला शाळेत घ्यायला गेल्यावरचं चित्र मात्र काहीसं वेगळंच होतं. डोळ्यांसमोर नसलेल्या आईच्या आठवणीने शिव रडत होता. कधी एकदा घरी जाईन, असं त्याला होत होतं. आई दिसताच धावत येऊन तो तिला घट्ट बिलगला. कदाचित 'कुठे होतीस इतका वेळ?' असंच काहीसं त्याला म्हणायचं असावं!

... खरंतर अतिशय स्वाभाविक असा हा घटनाक्रम... वर्षानुवर्ष हे असंच चित्र जगातल्या सगळ्या शाळा पाहत असतील. पण त्या चिमुरड्यासाठी आणि त्याच्या आईसाठी मात्र हा एक वेगळाच अनुभव होता. या नाजूक आठवणी श्वेताने आपल्या "http://shweta963.blogspot.com/" या ब्लॉगमध्ये व्यक्त केल्या. पण शिवचं काय? त्याने कसं व्यक्त व्हावं? आपल्या भावना आपल्या हळव्या आईसमोर त्याने कशा शब्दबद्ध कराव्यात?

... श्वेताचा ब्लॉग वाचल्यावर मला पडलेले हे प्रश्न! आणि म्हणूनच मी श्वेताला खालील पत्र लिहिलं... शिवच्या वयाचा असताना मी कदाचित माझ्या हळव्या आईला लिहू शकलो असतं, असं पत्र...

=========================================================

श्वेता,

तुझा ब्लॉग वाचला... अगदी पुन्हा-पुन्हा वाचला. उत्कट भावना जेव्हा शब्दरूप धारण करतात, तेव्हा त्या अधिक प्रभावीपणे व्यक्त होतात. तुझं लिखाण असंच काहीसं आहे. त्यामुळेच ते फार सहजपणे वाचकाच्या हृदयाचा ठाव घेतं. शब्दरूप विचार, वाचताना, पुन्हा एकदा भावनांचा ओलावा व्यक्त करतात आणि अशा वेळी अशा भाऊक विचारांना मिळणारी प्रतिक्रिया तितकीच उत्कट असते; नाही का? ... माझं हे पत्रही तसंच काहीसं आहे...

खरंतर कितीही 'भावना पोहोचल्या' असं म्हटलं, तरी एक 'आई' म्हणून तुझी मन:स्थिती पूर्णपणे समजून घेणं, कदाचित माझ्यासाठी अशक्यप्राय गोष्ट आहे. पण कदाचित शिवचं तीन वर्षांचं वयही त्याच्या सगळ्या भावना प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी परिपक्व नाही. त्यामुळे, तुझा हात सहजपणे सोडून त्याने त्याच्या विश्वामध्ये दंग व्हावं, याचा अर्थ त्याला असलेली तुझी गरज कमी होणं, असा लावला जाउ नये.

जर संपूर्ण घटनाक्रम नीट विचारात घेतला, तर शिवने तुझा हात सहज सोडला खरा; तो धावत जाऊन त्याच्या नव्या मित्रांमधे मिसळलाही खरा! पुढे त्यांच्याशी खेळण्यात त्यांचं रमणंही स्वाभाविकच आहे. पण त्याचं हे वागणं 'आपली आई आपल्या सोबतच आहे', या वैचारिक दिलाशावर आधारलेलं होतं. ज्यावेळी त्याच्या त्या आधाराला हादरा बसला आणि 'आपली आई कुठे दिसत नाही' याची जाणीव त्याला झाली, तेव्हा तोच शिव त्या सगळ्यांमध्ये एकटा पडला. माझ्या मते, तू त्याला घ्यायला गेल्यावर त्याने तुला मारलेली घट्ट मिठी त्याच्या रडण्यापेक्षाही अधिक बोलकी होती.

शिवचं रडणं किंवा मिठी मारणं, हे त्याला शब्दांमध्ये बांधता न आलेल्या भावनांचं व्याक्तरूप होतं.

खरंतर त्याला असलेली तुझी गरज कधीच संपणारी नाही. किंवा त्याच्या काळजीने त्याला कायम तुझ्या डोळ्यांसमोर ठेवणं, ही बिलकुल व्यवहार्य गोष्ट नाही.

शिवला आयुष्यात पुष्कळ प्रगती करायची आहे; उंच आकाशात स्वच्छंदी भरा-या घ्यायच्या आहेत. तूच जर त्याचे पंख होत राहिलीस, तर तो स्वत: कधी उडणार? शिवाय, तुझ्या सोबत नसण्याने त्याला असलेली तुझी गरज कधीच कमी होणार नाही; तर ती वाढेल. आणि त्याची ही गरज तू त्याचे पंख होऊन भागवण्यापेक्षा त्याच्या पंखांचं बळ होऊन भागवावीस. त्याने स्वबळावर घेतलेल्या प्रत्येक भरारीने तू सुखावशीलच, याची मला खात्री आहे.

खरंतर, हे सगळं तुला समजवावं, इतकं आयुष्य मी तरी कुठे पाहिलंय गं? पण तुझ्यातली आई जशी तुझ्यातून व्यक्त झाली, तसाच माझ्यातला अशाच एका हळव्या आईचा मुलगा व्यक्त होतोय... कदाचित! तुझं लिखाण मला त्या वयात घेऊन गेलं, जे वय मला आठवतही नाही. पण शिवची प्रत्येक कृती ही माझ्या 'त्या' वयातल्या वागण्याची प्रतिकृती असेल असं वाटतं आणि माझी आई ही तेव्हा तुझ्यासारखीच हळवी झाली असेल, याची खात्री आहे...

तुझा लेख वाचताना 'आठवत नसलेल्या' आठवणींनी माझ्या मनाचा (आणि डोळ्यांचाही!) ताबा घेतला होता. तू जवळ नसताना शिवचंही असंच काहीसं झालं असेल... नाही का?

मला गंमत वाटते, ती वयनिहाय परस्परविरोधी परिणामांची... शिवला शब्दांतून व्यक्त होणं जमत नसेलही; पण तो रडून मोकळा होऊ शकला. आणि, मला आज शब्दांतून व्यक्त होणं पुरेसं जमतं खरं; पण शिवसारखं रडता मात्र येत नाही... मोकळं होता येत नाही! 'ते' वय म्हणजे खरोखरच एक जमेची बाजू आहे बघ...

हळव्या आईचा अव्यक्त मुलगा,
शेखर
(Shekhar S Dhupkar)

साता समुद्रापार झेप घेताना...


'अमेरिका' या नावाबद्दल आपल्याकडे एकंदरीतच आकर्षणं आहे. लग्नाला उपवर मुलगा जर अमेरिकेला जाउन आलेला अथवा राहत असलेला असेल, तर वरमायेचा 'भाव' चांगलाच वधारतो. त्यामुळे बर्याचदा या देशाचा उपयोग लोक 'शिक्षण' म्हणून ही करतात... म्हणजे, 'यु. एस. रिटर्न' म्हटलं की, बर्याच गोष्टी झाकल्या जातात!

माझा जन्म मुळात अशा कुटुंबात झाला आहे की, भारत देशाबद्दल प्रेम, आदर आणि आस्था हेच मला मिळालेलं बाळकडू. देशासाठीच जगायचा आणि देशासाठीच... ... ... काम करायचं ('मरण्याचा विचार हाच अविचार' हे दुसर बाळकडू!), हे आमचं ब्रीद. त्यामुळे इथली संस्कृती, सभ्यता, समाज, आप्तस्वकीय यांना सोडून आपण इतरत्र राहू, हा मनात न डोकावणारा विचार होता. पण पुढे नशिबाने अशी काही पानं उलटली की, माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पाउल पडलं. हे क्षेत्रच मुळात संधी उपलब्ध करून देणारं! त्यामुळे पहिली संधी आली ती पदव्युत्तर शिक्षणाची...

पटनी आणि बिट्स, पिलानी यांच्या संयुक्त माध्यामातून 'एम. एस.' होणं, म्हणजे एक पंचवार्षिक योजना ठरली. ती पूर्ण करण्यात अभ्यास, एकाग्रता असल्या फुटकळ बाबींपेक्षा जिद्द, चिकाटी अशा बाबींनी अधिक हातभार लावला. 'एम. एस.' पूर्ण व्हायला दीड वर्ष शिल्लक असतानाच मला 'ओन्साइट'चे वेध लागले. पुढे पुढे जसं जसं 'एम. एस.' पूर्णत्वाला यायला लागलं, तसंतसं तर मला 'ओन्साइट'चं वेड ही लागायला लागलं होतं.

सर्वप्रथम बक्कळ पैसा आणि दुय्यम म्हणजे अनुभव या दोन गोष्टींसाथी मी माझ्या सर्व जवळच्या व्यकींचा सहवास सोडून साता समुद्रापार झेप घेण्याचा निर्णय घेतला होता... किंवा त्यासाठी उतावळा झालो होतो. आपण स्वजनांपासून सलग इतका काल इतके दूर राहू शकू का, हा एक प्रश्णं होता. स्वत: मागे लागून गावालेल्या 'ओन्साइट'च्या मध्यातून परतणं अशक्य आहे, या गोष्टीची जाणीव होत होती. पण, एक लांब उडी मारण्यापूर्वी थोडं मागे व्हावच लागतं..., अशी एक समजूत मन मला घालून देत होतं.

त्यामुळे भारताबाहेर जाण्याचा निर्धार माझ्याठिकाणी पक्का झाल्यावर मी तो वास्तवात आणण्याच्या कामी लागलो. सुमारे चार-पाच महिन्यांच्या त्या प्रयत्नांबद्दल लिहायचं, तर वेगळ्या शिर्षकाने एक अखंड लेख लिहिता येईल आणि ऑफिसमध्ये याकाळात खेळलेल्या राजकारणाचा आलेख मांडावा लागेल. आलेख मांडण्यात वावगं काहीच नाही; पण त्याच्याशी संबंधीत असलेल्या कोणाचंही माझ्याबद्दलचं चांगलं मत तो (आ)लेख वाचून आता बदलू नये, ही एक नम्र इच्छा!

थोडक्यात, १ फेब्रुवारी २००९ ला मी पुण्यभूमी सोडली आणि पुन्हा जन्मभूमी मुंबई कडे वळालो. मुंबईतल दीड महिन्याचं अनपेक्षितपणे सुखद गेलेलं वास्तव्य हा अमेरिका योगाचा पाया होता. ऑफिसची बससेवा असल्यामुळे लोकलच्या गर्दीला शिव्या घालण्याचा प्रश्न येत नव्हता आणि फेब्रुवारी अखेरीपर्यंत मुंबईत घाम येत नव्हता. त्यामुळे हे वास्तव्य सुखद होतं आणि याच कारणांमुळे अनपेक्षितही!

फेब्रुवारीच्या अखेरीसच मला कल्पना देण्यात आली होती की, १४ मार्चच्या रात्री उशीरा निघावं लागणार. त्याद्रुष्टीने तयारी सुरू झाली. परंतु इतरांच्या उदाहरणांवरून तिकिटे हाती येईपर्यंत काहीच निश्चिती नसल्याचं मनात पक्कं होतं. प्रत्येक दिवस प्रवासाच्या द्रुष्टीने एक-एक पाउल पुढे जात होतं. पण, या सर्व गोष्टीण्ची चाहूलही फारशी कोणाला नव्हती. धुलीवंदनाच्या दिवशी या गोष्टीची कल्पना नातेवाईक आणि जवळच्या मित्रांमध्ये दिली आणि त्यांचा 'एवढ्या उशीरा सांगितल्याबद्दल' रोष ओढवून घेतला. आता हा रोषही प्रेमोत्पन्नच होता, हे उघडपणे सांगण्याची काहीएक गरज नाही... (पण आता सांगून झालंय!)

सर्वांनी केलेल्या अतोनात कौतुकामुळे माझं अमेरिकेबद्दलचं कुतूहल वाढत होतं आणि पर्यायाने वाढत होती, ती जबाबदारी... गोर्यांच्या देशात यश मिळवण्याची! 'मी अमेरिकेला जाणार' याचं सर्वांना असलेलं अप्रूप पाहून मला आश्चर्य वाटत होतं, ते पु.लं.च्या बघुनानांचं... "अमेरिकेत काय! हल्ली पट्टेवालेसुद्धा जातात!" हा मधल्या आळीचं नाव सार्थ करत मारलेला शेरा अगदीच विसंगत वाटत होता... (संदर्भ कथा: म्हैस) तर इतकं कौतुक होत होतं... आशीर्वाद मिळत होते... प्रेम मिळत होतं...

प्रवासापूर्वीचे दोन दिवसा जसे फोनवर बोलण्यात गेले, तसे ते भरलेल्या बेगा पुन्हा-पुन्हा उचकटण्यात आणि भरण्यात गेले. सोबत नेण्याच्या वजनावर घातलेले निर्बंध फारच जाचक वाटत होते. पण पर्याय नव्हता...

मित्रमंडलींपैकी 'भावना' मला विमानतळावर सोडायला येणार होती. पण ती घरी वेळेपूर्वी पोहोचली आणि तिच्याबरोबर अनपेक्षितपणे आलेल्या मंदार आणि आदित्य यांना पाहून सुखद धक्का बसला. त्या तिघांची उपस्थिती सर्वार्थाने आनंद देणारी होती. निघण्यापूर्वीचं घरातलं वातावरण हलकं ठेवण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. पुण्याहून मला निरोप द्यायला आलेल्या मित्रांच्या प्रेमाच्या ऋणात राहणंच, मी पसंत करीन. इतरही मित्र-नातलगांनी प्रत्यक्ष भेटून अथवा फोनवर संपर्क साधून शुभेच्छा - आशीर्वाद सोबत दिलेच होते. उज्ज्वला ताई अमृता - सम्राज्ञीला घेऊन भेटायला आली होती. गोळे सर आणि काकूसुद्धा पुष्पगुच्छ घेउन आले होते. या सगळ्याचं ओझं समर्थपणे पेलण्याचं बळ माझ्या पंखांना द्या, असं म्हणत आई-बाबा आणि देवाच्या पाया पडलो.

संध्याकाळी साडेआठच्या सुमारास आमच्या गाड्या निघाल्या; तेव्हा डोळ्यात उतरलेल्या अश्रूंमधे लक्ष दिव्यांचा प्रकाश प्रसारण पावत होता आणि संकेत देत होता... नव्या वाटेचे... जिथे पसरला आहे प्रकाशच प्रकाश! दोन तासांच्या वेळात गाड्या मुंबईच्या भव्यदिव्य आंतरराष्ट्रीय विमानतळावर येउन पोहोचल्या. विमानतळाच्या पार्किंगमध्ये श्रीगणेशाचं नाव घेउन उपास सोडला आणि निघालो ते उज्ज्वल भविष्याच्या प्रवेशद्वाराकडे...

रात्री अकरा वाजता आई-बाबा-सौरभ-मंदार-आदित्य-भावना यांचा निरोप घेउन विमान'तळात' प्रवेश केला आणि स्वत:ची आणि सोबतच्या सामानाची तपासणी सुरक्षा आधिकार्यांकडून करून घेण्यासाठी सज्ज झालो. ब-याच पातळयांवर चौकशी करूनही माझ्यात काहीच वावगं न सापडल्यामुळे सुमारे तासाभराने मी प्रतीक्षाकक्षात पोहोचू शकलो.

पहाटे २:३५ ला विमान उड्डाण करणार होतं. पण तोपर्यंतचा वेळही फोनवर बोलण्यातच गेला. मधल्या काळात आई-बाबा-सौरभ डोंबिवलीला घरी पोहोचले होते आणि मंदार-भावना-आदित्य पुण्याला मार्गस्थ झाले होते.

रात्री सव्वादोन नंतर आमचं विमान लंडनच्या दिशेने उडण्यास सिद्ध झालं. विमानाच्या प्रवेशद्वारापाशी प्रवाशांची एकच झुंबड उडाली... अगदी वडगावची एस.टी. निघणार म्हटल्यावर रहिमतपूर च्या स्थानकात व्हावी, तशी! पण जेट एअरवेजच्या चपळ कार्यकर्त्यांनी सर्वांना शिस्तीने विमानात प्रवेश द्यायला सुरुवात केली. या कार्यकर्त्यांमध्ये सहजस्मित करणा-या स्त्री-कार्यकर्त्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे, एस.टी. च्या कंडक्टरने अर्वाच्य भाश्हेत उद्धार करावा, अशी घटना कोणत्याही प्रवाशाच्या बाबतीत इथे घडली नाही.

सुमारे पाच-सहाशे प्रवाशांना घेउन सज्ज झालेल्या या विमानाने 'यंत्रांचा आवाज' बरोबर २:३५ ला सुरू केला. पुढील दोन मिनिटात पायलटने 'रिव्हर्स' टाकला आणि पाचच मिनिटात त्या महाकाय यंत्राने माझ्या महत्त्वाकांक्षांच्या दिशेने झेप घेतली... - शेखर श. धूपकर

(Shekhar S Dhupkar)