Friday, January 1, 2021

चड्डीतलं २०२०

प्रिय २०२०,

शि.सा.न.

तुला 'प्रिय' म्हणणं खरं तर जीवावरच आलंय; पण आता तू उलटून गेल्यावर तसं म्हणायला फारशी हरकतही नाही! कालच आम्ही तुला मनोभावे निरोप दिला.... अगदी गेल्या २०१९ वर्षांना दिला नव्हता, इतक्या मनोभावे दिला. एकीकडे तुला इतिहासजमा करण्यासाठी आम्ही अत्यंत आतूर झालो होतो आणि तरी तुझा निरोप आम्हाला जल्लोषात देता आला नाही. याचं श्रेयही अर्थात तुलाच आहे. बरं; फक्त कालच नाही, तर सुरुवातीचे दोन अडीच महीने सोडले, तर जवळजवळ वर्षभरच तू आम्हाला जे मनाप्रमाणे जगू दिलं नाहीस ना, त्याबद्दल तुला शिरसाष्टांग नमस्कार आहे. 🙏

हो; आम्ही तुला आमच्या मनाविरुद्ध जगलो. आम्ही २०२० खरंच मनाविरुद्ध जगलो. आणि तसं जगण्यास तू आम्हाला भाग पाडलंस. नाही तर आम्हाला इतकं अडवण्याची आणि बांधून अथवा डाम्बून ठेवण्याची क्षमता आमच्या तीर्थरूपातही नाही आणि 'कुटुंबात'ही नाही. म्हणजे एक तर घराबाहेर जायचंच नाही; वर सारखी स्वच्छता बाळगायची! याला काय अर्थ आहे; मला सांग. गेल्या नऊ दहा महिन्यांत बरंच काही स्वच्छ करून टाकलंय आम्ही. हातांपासून ते घराच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत; आणि विचारांपासून सवयींपर्यंत.

तुझ्या मनात नक्की काय होतं, ते उलगडलंच नाही कधी आम्हाला. स्वावलंबन शिकवणं, हे जरा अतीच होतं बरं का! अरे स्वतःची कामं कधी कुणी स्वतःच करायची असतात का रे? सलग पाचव्या दिवशी घरी जेवावं लागलं, तर पोटात कळा येणाऱ्या आम्हाला तू चक्क सहा महिन्यांच्याहुनही वर घरचा स्वयंपाक आवडायला लावलास! बारा तासात परत भेटून सुद्धा बारा वर्षांनी भेट झाल्यासारखे एकमेकांच्या गळ्यात पडणारे आम्ही सध्या भेटायलाच नाही म्हणतो. आलोच समोरासमोर, तर सहा फुटांवरून बोलतो. कुठे नेऊन ठेवलीस आमची जिव्हाळा व्यक्त करण्याची लाघवी पद्धत? ... बरं, हे सगळं ही एकीकडे; पण सुंदर मेकअप करून नटून थटून बाहेर पडावं, तर तो सजवलेला चेहरा ही झाकूनच फिरायचं! नाही घातला मास्क, तर दंड भरावा लागतो तो वेगळा. शाळेत जाणाऱ्या आमच्या पोरांचा अभ्यास घ्यायला भाग पाडलंस रे तू आम्हाला दोन हजार वीस! इतका अतिरेक कशासाठी? परवा तर मी माझ्या पोराला पाठीवर घेऊन चक्क घोडा घोडा खेळलो गाढवासारखा. गेल्या नऊ महिन्यात घराबाहेर न पडणाऱ्या आमच्या मुलांना घोड्याची ओळख घरातच व्हावी, हे त्यांचं किती दुर्दैव! (गाढवाची ओळख त्यांना पहिल्यापासूनच असल्यामुळे तिथे फारसा प्रश्न नाही). अरे पण काय अर्थ आहे या सगळ्याला???

आम्हाला संयम वगैरे शिकवलास तू! काही जणांना ते न झेपून नकारात्मकता ही वाढली आमच्यात बऱ्याचदा. ह्या आणि अशा कित्येक कारणांनी तू उलटून जाण्याची वाट आम्ही पाहात होतो. अतिशय शांतपणे तू निघून गेलास; पण प्रत्येकाच्या आयुष्यात तू कायमचा स्वतःला कोरून गेलास बघ. २०२०, तू चिरंजीव आहेस. आजपासून २००० वर्षांनी सुद्धा तुझ्याशिवाय पृथ्वीचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. नुसत्याच गरगर फिरणाऱ्या आम्हाला तू चक्क स्तब्ध केलंस; आमच्या स्वैराचाराला वेसण घातलंस; आम्हाला 'सोवळ्यातली' स्वच्छता शिकवलीस; आमची कुटुंब जोडलीस; नात्यांचं महत्त्व समजावलंस. थोडक्यात तू आम्हाला चड्डीत रहायला शिकवलंस. मुळात, घरातच असल्यामुळे, आम्हाला गेले ९ महीने तू अर्ध्या चड्डीत रहायला शिकवलं आहेस. पण अर्ध्या चड्डीचा शिस्तीशी फारच जवळचा संबंध असल्यामुळे सर्वतोपरी तू अट्टाहासाने आम्हाला नियंत्रणातच आणलंस.

आता झालंय काय की, तू तर उलटून गेलास. आमची इच्छा पूर्ण केलीस. पण अजून आम्ही मोकाट व्हायला धजावू शकत नाही. परीणाम खूप खोलवर करून गेला आहेस. आणि धाक जो मनात बसवला आहेस ना; त्यामुळे उद्या '२०२० च बरं होतं', हे म्हणण्याची वेळ तर येणार नाही ना, अशी भीती आहे मनात कुठेतरी. अर्थात आम्ही काळजी घेऊ. पूर्ण काळजी घेऊ. पण कडक शिक्षकांचा तास कसाबसा संपवल्यावर मात्र लाडक्या आणि प्रेम करणाऱ्या शिक्षकांचा तास यावा, अशी एक सोज्वळ अपेक्षा ठेवून आम्ही २०२१ कडे आशा लावून बसलो आहोत. आज त्याची सुरुवात झाली आहे. तू योग्य त्या सूचना त्याला दिल्या असशील, याची खात्री आहे रे.

असो. 'कळावे' हा मायना आम्हाला जास्त लागू आहे. 'लोभ असावा' आणि त्या लोभापायीच आम्हाला हे धडे तू दिले असावेस, याची खात्री आहे. आमच्या आठवणीतच नाही, तर सवयीत आणि अगदी परंपरातही तू राहशीलच.

तुझा नम्र,
शेखर श. धूपकर

Saturday, April 4, 2020

कोरोना विरोधात दिवे का लावायचे???


कोरोना विरोधात दिवे का लावायचे???
                                                           - शेखर श. धूपकर

आपण भारतीय कायमच बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध राहीलेलो आहोत. ह्या बुद्धिमत्तेने आपल्याला खुल्या केलेल्या वेगवेगळ्या उद्योगांमधील संधींचं आपण सोनंही करत आलेलो आहोत. पण ही बुद्धिमत्ता दुधारी तर नाही ना ठरणार, असा प्रश्न मला गेले काही दिवस पडू लागला आहे.
समस्त जगाला सध्या जेव्हा कोरोनाने घरी बसवलं आहे, तेव्हा तर आपल्या बौद्धिक विचारांना आणखीनच चालना मिळाली आहे. आणि सोशल मीडियाने त्या विचारांना एक खुलं व्यासपीठ दिलंय; ज्यामुळे प्रत्येकाचे विचार आणि प्रत्येकाच्या प्रत्येक विचारावर इतर प्रत्येकाचा वैचारीक उहापोह ह्याने तयार झालेल्या शृंखला कोरोनापेक्षाही जास्त गतिमान आणि धास्तावणाऱ्या ठरत आहेत.
माननीय पंतप्रधान मोदींनी दिवे मालवून लावायल्या सांगितलेल्या दिव्यांचा प्रकाश तर कित्येकांच्या डोक्यात इतका मोठा अंधार करून गेलाय की त्या अंधारात कोरोना टिकून राहणं अवघड होऊन बसलंय. काही जण ज्योतिषशास्त्राचा आधार घेत आहेत; तर काही जण संख्याशास्त्राचे दाखले देत आहेत. काहींना ह्यामध्ये अफाट आणि प्राचीन संस्कृती दिसते; तर काही जण त्याचा संबंध थेट ग्रह ताऱ्यांशी लावून मोकळे होतात. आणि मग ह्यावर विविधांगी विवाद सुरू होतात. त्यातून आधुनिकतेचा बडगा व्यक्त करणारे ही काही कमी नाहीत. अचानक दिवे बंद केल्यामुळे विद्युत भारनियंत्रणाची कशी तारांबळ उडेल, हे पटवून देणारेही काही निघाले. त्यांना 'अर्थ अवर'चा विसर पडला असावा. किंवा, दिवे बंद करायचे म्हणजे पंखे, फ्रीज आणि इतर उपकरणं बंद होण्याचा प्रश्न येत नाही, हे त्यांच्या लक्षात येत नसावं.
काहीजणांनी ह्या आवाहनाला सरळ सरळ मुर्खपणाचं ठरवून इतरही कोणी हे करणार नाही, असा निकाल देऊन टाकला. काहींना ह्यात 'आधी ध्वनी, आता प्रकाश' अशी श्रुंखला दिसली. ह्यावर होत असलेले उहापोहही अत्यंत वैचारीक भासतात.
एवढे सगळे विचार व्यक्त होत असताना फक्त माझीच बुद्धिमत्ता कमी दिसेल किंवा दिसणारच नाही, ह्या भीतीपोटी मी ही माझा विचार व्यक्त करायचं ठरवलं आहे. मोदीजी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आहेत. त्यांनी जो काही विचार करून हे आवाहन केलं आहे, त्यावर उलटसुलट चर्चा न करता आपल्या नेत्याने सांगितलं आहे एवढ्याच कारणाने आपण ही क्रिया करू शकत नाही का? बरं; त्यातूनही, ज्यांना हे करायचं नाही, त्यांनी हे करू नये; आणि शांत बसावं. हवं तर घरातले दिवे सुरू ठेवून आणखी लावावेत. पण देशाच्या पंतप्रधानाला खरंखोटं ठरवण्याच्या नादात, सांगितलेल्या वेळेच्या आधी आणि नंतरचे दोन दिवस आपल्या अकलेचे तारे तोडणं किंवा प्रकाश पाडणं, ह्यामधे दवडू नयेत. पटलं तर करावं आणि नाही पटलं तर सोडून द्यावं. आपली अफाट बुद्धिमत्ता देशाच्या पंतप्रधानांची वैचारीक पातळी काढण्यासाठी किंवा पटवण्यासाठी खर्चू नये.
ही आपली माझी एक विनंती. न पटल्यास, ती ही सोडून देता येईलच किंवा ह्यावरही चर्चा करता येईलच! 😊

- शेखर श. धूपकर

Sunday, September 29, 2019

चिरतरुण सहजीवन

                                                              - शेखर श. धूपकर

खिडकीलगतच्या टेबलावर, कोपरावर हलका जोर देत आणि हनुवटी मुठीवर टेकवून आजोबा, आजीकडे एकटक बघत बसले होते. आजी मात्र डोळे मिटून स्वतःच्याच विश्वात रमल्या होत्या. आजोबांना वाटलं, जुनी गाणी गुणगुणत असेल कदाचित. पण आजी मात्र 'हा चावट माणूस विशीतही असाच बघायचा माझ्याकडे!', या चिंतनात स्तब्ध होत्या. हो! कारण त्या तेव्हा जशा लाजायच्या, तशाच आजही... त्यामुळे डोळे मिटून, त्या आजोबा झोपायची... किंवा पेंगायची वाट बघत गालातल्या गालात हसत होत्या.

खरं तर, यात फारसं नवीन असं काहीच नव्हतं. दुपारच्या जेवणानंतर शतपावली झाली की दोघांच्याही दिनाक्रमाचा आवडता वेळ होता हा! आजोबांनी निवृत्ती घेतली, तेव्हा आजींनी आपलं आयुर्वेदालय सुरू ठेवलं होतं. पण मुलीला नोकरी लागल्यावर तिनं हट्टानं दोघांनाही घरी बसवलं. साधारण  तेव्हापासून दोघांनी हा शांत संवादाचा प्रेमळ वेळ रोज जपला होता.

मानसीचं लग्न झाल्यापासून तसंही दोघांचं दैनंदिन जग एकमेकांपुरतंच मर्यादीत राहीलं होतं. पण दोघंही सुखी आणि आंनदी होती. दोघांनाही कसलीही व्याधी नव्हती; दुखणी नव्हती; की पथ्य नव्हती. त्यामुळे वर्तमानपत्र आधी कुणी वाचायचं, चहा आज कुणी करायचा, ज्येष्ठ नागरीक संघातल्या विवाद स्पर्धेत कुणाची बाजू अधिक दमदार होती, माधुरी जास्त सुंदर की गोविंदा अधिक पाचकळ, या आणि असल्या अनेक मतभेदांनी त्यांच्या भरलेल्या ताटात चटणी-लोणच्याची जागा घेतली होती. फारच विकोपाला जाणारी समस्या म्हणजे आईस्क्रीमचे फ्लेवर्स!!!

वस्तुतः, आजी-आजोबांच्या ह्या चिरतरुण सहजीवनाला, आयुष्यभर घट्ट दिलेल्या साथीचं तगडं पाठबळ होतं. कशाची कधी फारशी कमी नसली, तरी दोघांनीही वैयक्तिक उन्नतीसाठी खूप मेहनत घेतली होती. ती तशी घेताना आपल्यापेक्षा जास्त, आपल्या सहचाऱ्याला महत्त्व दिलं होतं. त्यामुळे पूरक विश्वास आणि सहचर्याच्या जोरावर उभयता आज मानाजोगतं आयुष्य जगत होते.

त्यांच्या ह्या रुळलेल्या दैनंदिनीत संध्याकाळचा फेरफटकाही न चुकणारा! घराबाहेर पडलं की दोन पावलं पुढे राहणारे आजोबा ज्या दिशेला निघतील, तिकडे आजींचीही पावलं वळतात. आजोबांच्या कधीकधी एकदम लक्षात येतं; आणि ते क्वचित थांबून आजींना सोबत येऊ देतात. आजी मात्र बऱ्याचदा स्वतःहूनच संथ पावलं टाकतात आणि आजही खात्री करून घेतात, की 'म्हातारा आपल्याला विसरला तर नाही ना!'. आजींच्या असल्या खोडसाळपणाला त्यांच्या लग्नाच्या आसपासचा काळ थोडा कारणीभूत होता. बाहेर पडले की तरुणपणीचे आजोबा तरातरा पुढे निघून जात. आजीच मग त्यांना हाक मारून किंवा तोंड फुगवून मागे ओढत. आजही आजोबा कायम दोन पावलं पुढेच असतात; पण त्यांना हाकेची गरज पडत नाही.

हा फेरफटका मारून येताना, परतणीच्या वाटेवर, पाणीपुरीवाल्याकडे बघून न बघितल्यासारखं करणाऱ्या आजींना, "चल, आज एकेक खाऊच!" म्हणत आजोबा अधूनमधून घेऊन जातात. "कॉलेजमधे असताना रोज संध्याकाळी खायचीस!" असं म्हणत ते आजींना वर आणखीन ऐकवतात. आजींना मात्र कोलेजमध्येही पाणीपुरीशी मतलब असे; आणि आजही ह्यांचे टोमणे फारसं परावृत्त करू शकत नाहीत.

चिंचेच्या आंबटगोड चटणीतला तो हवाहवासा वाटणारा चटकारा दोघांनीं आयुष्यात कित्येकवेळा अनुभवला होता. तिखट चटणी जशी चव यावी आणि आपल्यालाच वाटावं म्हणून थोडीशी घ्यावी; तशाच नको त्या आठवणी त्यांनी तोंडी लावायलाच ठेवल्या होत्या. थोडक्यात काय, तर पाचसहा दशकांच्या सहवासाने आजी-आजोबांचं सहजीवन हे एकमेकांवरच्या विश्वासाने चांगलंच मुरलं होतं आणि त्याने त्यांच्यामधल्या प्रेमाला विविध पैलूही दिले होते.

"तू डोळे मिटून त्या सेकंड ईयरच्या प्रणालीलाच आठवतोस ना रे अजून?", ह्या प्रश्नाने डुलकी तुटलेल्या आजोबांची एकदम हनुवटी सरकते आणि ते पटकन आजींना उतरतात, "छे गं! प्रणाली नव्हे... माया ती, माया...!"

- शेखर श. धूपकर

Monday, February 8, 2016

पुणे आणि पुणेकर 
- शेखर श. धूपकर

ब-याचदा 'पुणे' आणि 'पुणेकर' हा टीकेचा विषय असतो. 'पुणेरी पाट्या' या नावाखाली कुठलाही अतिस्पष्ट, उपरोधक अथवा खोचक मजकूर पसरवण्याचीही एक प्रथा सध्या रुजू झाली आहे. 'सदशिवपेठी' अशी एक सकारण पदवीही कित्येकांना दिली जाते. गंमत म्हणजे हा उपरोध करणारे जास्तीत-जास्त जण पुण्याबाहेरचे आणि तरीही येणकेणप्रकारेण पुण्याशी निगडीत असतात. मग उपरोधाची जबाबदारी फक्त पुणेकरांच्याच माथी का बरं मारली जाते? कदाचित हा वाहत्या मुळा-मुठेत हात धुवून घेण्याचा एक प्रयत्न असावा! बाकी, मुळा-मुठेला फारतर हात धुण्याएवढंच पाणी असल्यामुळे आणि त्यावरही वारंवार जलपर्णी साचत असल्यामुळे हा निव्वळ एक आड'मुठा' उपरोधच असावा!

मुळात, या पुण्यनगरीची अशी ओळख का व्हावी, हा पुण्यातल्या सम-विषम तारखांच्या पार्किंगइतकाच वादग्रस्त विषय आहे. कारण जगाच्या नकाशावर पुण्याला आज मोठं स्थान आहे. आता, तरीही पुण्यात पत्ता शोधणं हे फ़र्ग्युसन रस्त्यावर बुरखेधारी मुलींपैकी नेमकी आपली कन्यका शोधण्याइतकं कठीण आहे, ही बाब निराळी. पण न सापडणारे पत्ते हा दोष पुण्याचा नाहीच! जंगली महाराज रस्त्यावर उभं राहून 'जे. एम. रोड' शोधणा-यांना शोधूनही हाती लागेल ते काय? नारायण पेठेतून स्टेशनला जाताना 'शानिवारातून जा हो. बुधवाराची गल्ली टाळ' असा अनुभवी सल्ला ऐकल्यावर जर 'नक्की कसं जायचं' आणि 'कुठल्या वारी जायचं नाही' असले गावंढळ प्रश्न पडत असतील, तर तो पुण्याच्या पत्त्यांचा वाईटपणा ठरू नये. अहो! जिमखाना अस्तित्त्वात नाही म्हणून डेक्कनला 'गरवारे' म्हणणारे पुण्यात पत्ता काय शोधणार? आपल्या अज्ञानाचं खापर पुण्यावर न फोडणा-यांनीच पुण्यात बिनधास्त फ़िरावं.

बाकी पुण्यात बिनधास्त फ़िरायचं ते दुचाक्यांवर! पण कोथरुड-औंधकडच्या दुचाक्या ही "पुण्याच्या" व्हायला कधी कधी वेळ घेतात. त्या लक्ष्मी रस्त्यावर पोहोचताना शनिवारवाड्यापाशी किंवा विजय टोकिजपाशी पोहोचल्या की थबकतात. सौरभ गांगुलीने धावेचा कॉल कितीही विश्वासाने दिला असला, तरी दुस-या टोकाचा फलंदाज ज्या दुविधेत धाव घेण्यास सुरवात करे, तसली काहीशी अवस्था या दुचाकीस्वरांची या ठिकाणांवर होते. बाकी, पुण्यातल्या पेठांमधून बिनधास्त रपेट मारायला अतोनात आत्मविश्वास हवा. कारण ज्यावेळी तुम्ही रस्त्यावर लाल-हिरवे होणारे दिवे, 'मामा' नामक ट्राफिक पोलिस, रस्त्यावरची इतर वाहनं, कधीही रस्ता ओलांडणारे पुणेकर आणि कुठूनही आडवी येणारी कुत्री यांना पाहूनही न पाहिल्यासारखं करत गाडी पळवू शकता, तेव्हाच तुम्ही विना-परवाना पुण्यात गाड्या हाकण्याचा परवाना मिळवता. यानंतर ब्रेक ही तुमच्या वाहनाची एक निरुपयोगी बाब होऊन तुम्ही गाडी बिनधास्तपणे पळवू शकता. स्त्री-चालकांच्या मते देवाने शरीराला पाय जोडलेले असताना, गाडीला ब्रेकची तशी फ़ारशी गरज नसते. आणि अशी सगळी वैशिष्ट्य तुमच्यात असतील, तर तुम्ही 'पुणेकर' होण्यास पात्र आहात. 

इथे 'पुणेकर होणं' ही वारसाने, वास्तव्याने अथवा जन्माने येणारी बिरुदावली नाहीच मुळी! कुणीही पुणेकर होऊ शकतो. पु. लं. नी म्हटल्याप्रमाणे फक्त जाज्वल्य अभिमान हवा. पुणंही बाहेरच्यांना पुणेकर करून घेण्यास सदा उत्सुक असतं. जुनं आणि सनातन म्हणवलं, तरी ते बदलांसाठी कायम तयार असतं. मला सांगा, अप्पा बळवंत चौकाचा 'एबीसी' होऊ देणारं पुणं जुनाट कसं? गाडगीळ पुलाला 'झेड ब्रिज' या एकाच नावाने ओळखणारं पुणं सनातन कसं? दशकापूर्वी लहान मुलांसोबत कुटुंबांना बागडवणारी संभाजी बाग आज बालक्रीडा विसरून प्रणयक्रिडा अनुभवते, हा पुण्याच्या बदलाचा पुरावाच ठरवू नये का? त्यामुळे ऐतिहासिक पुण्याला विनाकारण हिणवण्याचा हा एक आपमतलबी प्रयत्न असवा.

याउलट पुण्याने जुन्या-नव्याची आदर्श सांगड नक्कीच घातलेली दिसते. ई-स्क्वेअरला गर्दी करणारं पुणं बालगंधर्वही 'हाऊसफ़ुल्ल' करतं. कुण्या 'के के' च्या 'झेड झेड' तालांवर थिरकणारं पुणं दरवर्षी 'सवाई गंधर्व'लाही उत्कट दाद देतं. जेवढा 'फिनिक्स मॉल' महत्त्वाचा, तेवढंच भारत नाट्य मंदीरही! बाकी जाऊ द्या, बुधवार पेठ आहे म्हणून पुण्यात मसाज सेंटर सुरूच झाले नाहीत की काय?

याहीपेक्षाही पुणं जेवढं कलासक्त आहे, तितकंच ते रसासक्तही आहे. 'पिझ्झा हट' दिवसाला जेवढ्या मिठ्या अनुभवत नसेल, त्यापेक्षा जास्त पंगती दुर्वांकूर दर तासाला उठवतं. नेवळ्यांची मिसळ जिथे काना-नाकातून धूर काढते, तिथेच सुकांता-श्रेयसचं गोडसर जेवणही मिटक्या मारत केलं जातं. जेवणानंतर 'शौकीन'ची पंधरापासून ते पाच हजार रुपयांपर्यंतची पानं तोंडं रंगवतात. सिंहगडावरचं पिठलं-भाकरी आणि मटका-दही कसंही असलं, तरी 'एक नंबर' म्हणत पुणं पोटभर जेवतं. विमाननगर, सेनापती बापट रस्ता आणि चांदणी चौकातल्या महागड्या खाणावळींमधे पुणं रात्रीचं जेवण तासंतास रिचवतं. हो ना! महागड्या झाल्या, म्हणून खाणावळींना 'हॉटेल्स' म्हणालं, तर ते पुणे कसलं? आता, गुडलक आणि वहुमन जर दशकानुदशकं इराण्यांची राहू शकतात, तर हॉटेल्स अजूनही खाणावळी का बरं नाही राहणार?

असॊ… माझ्या बोलण्यातला हा अभिमान मी पक्का पुणेकर असल्याची साक्ष देतो. तरीही मी पुण्यात आजवर 'पुणेरी पाट्या' इतक्या सर्रास पाहिलेल्या नाहीत, जितक्या त्या सोशल मिडियामधे फिरताना दिसतात. खवट माणसं काय फक्त पुण्यातच राहतात होय! पण पु.लंनी म्हटल्या प्रमाणे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान मात्र पुण्यातच होऊ शकतो. त्यालाही कारण आहे. अपमान सोडा, पण मुंबईकराला जिथे बोलायलाच वेळ नसतो, तिथे तो कुणाच्याही वाकड्यात तरी काय शिरणार? बाकी मुंबईकराची मराठी ही बहुभाषांचं मिश्रण आहे. तिकडे सांगली-कोल्हापूरची मराठी रांगडी. आणि त्या रांगड्या मराठीचा लहेजा तिला गोडवा देऊन जातो. पण या रांगड्या गोड मराठीतून व्यक्त होणारे अपशब्द पुण्याला खटकतात. विदर्भाची मराठी ही अखंड भारतात 'हिंदी' या नावाने ओलखली जाते. त्यामुळे पुणेकर त्यांना बाद ठरवतात. खानदेशी मराठी ही खानदेशाशिवाय कुणालाही समाजात नाही. मराठवाड्याच्या मराठीवर अजूनही निजामाचा परिणाम जाणवतो. त्यामुळे पुणं मराठवाड्याला आजही पाण्यात राहतं. उरलं कोकण! ते पुण्याला तोडीस तोड. हजरजबाबीही आणि अत्यंत खवटही! पण स्वत:चा चाराचौघाताला अपमान टाळण्यासाठी दोघंही एकमेकांशी सांभाळून राह्तात. पण या फ़रकांमुळे भाषाप्रभू पुणं इतरांना मान देत नाही; याचा त्यांना अपमान वाटतो, एवढंच!

आत्तापर्यंत इतिहास झाला, भाषा झाली, स्वभाववैशिष्ट्यही झाली; म्हणून भूगोलाबद्दल बोलायचंच, तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पुण्याला सिंहगडाचे कडे लाभलेत. आजच्या तारखेला पुणं या कडे-कपारींपलीकडे कुशी ओलांडून सर्व दिशांना फ़ोफ़ावतंय. हा बदलणारा भूगोल आहे. तरी मुळा-मुठा आणि पवना-इंद्रायणी वाट मिळेल तशा पुण्यातून वाहतात. पर्वती, हनुमान टेकडी, वेताळ टेकडी, चतु:श्रुंगीच्या माथ्यावरून आजही पुष्कळ हिरवं पुणं पहायला मिळतं. तरी पुण्याला निष्कारण हिणवलं जातं; टोचलं जातं.

आज पाताळेश्वराच्या लेणी गुफ्तगू करणा-या होतकरू प्रेमियुगुलांना जागा देतात; म्हणून भाडं मागत नाहीत! पुणं दिलदार आहे. क्यांपातून हिंडताना आपण पुण्यात सोडा, पण नक्की 'भारतातच आहोत ना', अशी शंका यावी, अशी वेशभूषा दिसते. यात तोकड्या वेशाची भूषाच अधिक जाणवते; पण म्हणून पुण्यानं टोकाची भूमिका घेतली नाही. दुपारी आवर्जून झोपण्याची ओळख असलेल्या पुण्याच्या कित्येक भागांमधे माहिती-तंत्रज्ञानातल्या कंपन्या आज रात्रीही झोपत नाहीत. गि-हाइकाच्या तोंडावर दुकान बंद करणारे चितळे जितके किलो चक्का तासाभरात विकतात, त्याच्या कित्येक पटीने बाकरवडी विदेशात पाठवतात. आळशी दुकानदार इतकी प्रगती कशी करू शकेल? जुन्या वाड्यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या टोलेजंग इमारती आज पुण्याचा विकास दाखवतात. नव्या शिक्षणसंस्थांसोबत जुन्या भावेस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, हुजूरपागा आणि नूमवि विद्यार्थी आजही तसेच घडवतात. हे घडलेले विद्यार्थी देशोदेशी कीर्ती मिळवतात, पण पुणं सोडत नाहीत. भले-भले 'पुणेकर' जगणं विसरत नाहीत.

थोडक्यात सांगायचं तर इतक्या अष्टपैलू पुण्याला आणि तितक्याच हरहुन्नरी पुणेकरांना अकारण हिणवणं असयुक्तिक आहे. अनादी काळापासून ज्ञानदानाचं कार्य अविरत करत आलेल्या या पुण्यनगरीला उणं असं काहीच नाही. हजरजबाबी आणि रोखठोक असली, तरी ही नगरी कधी आपल्या टिकेवर रुसली नाही किंवा ती करणा-यांवर हिरमुसली नाही. आपल्यातले बदल तिनं, जुनं टिकवत सुरूच ठेवलेत. आणि ती ते कायम ठेवेल. मुद्दा एवढाच की अशा गुणवान पुण्याची आणि पक्क्या पुणेकरांची मस्करी करतच रहायचं की त्यांचा कित्ता इतरांनीही गिरवायचा! ज्याचा त्याचा प्रश्न आहे… सच्चा पुणेकर स्पष्ट बोलतो, उपरोधही करतो; पण फुकट सल्ले देण्यात वेळ दवडत बसत नाही. असॊ… रविवार दुपारच्या वामकुक्षीची वेळ झाली असल्यामुळे मी आटोपतं घेतो.

धन्यवाद.

Monday, January 25, 2016

लग्न - एक चर्चा
                                                                                                                              - शेखर श. धूपकर

'लग्न' हा कायमच एक चर्चेचा विषय ठरत आलेला आहे. 'लग्न कसं करावं' यावर गहन चर्चा, 'कुणाशी करावं' यावर घरगुती चर्चा, 'कोणत्या पद्धतीनं करावं' यावर बौद्धिक चर्चा, 'कोणत्या मुहूर्तावर करावं' यावर शास्त्रपूर्ण चर्चा, 'किती खर्चात करावं' यावर व्यावहारिक चर्चा, 'करावं की करू नये' असली निरर्थक चर्चा…! एवढंच काय, पण 'लग्नानंतरचे परिणाम' वगैरे सापेक्ष चर्चा, 'नुकत्याच पार पडलेल्या  लग्नाबद्दल' आतल्या गोटातल्या चर्चा, 'मी तिला विचारायला जरा उशीरच केला', असली स्वगत चर्चा किंवा 'यांचं कसलं टिकतंय वर्षभर तरी!' यावर भविष्यवर्तक चर्चा… एकंदरीत काय, तर 'लग्न' म्हटलं, की चर्चा ही आलीच! इतिहासात डोकावून पाहिलं, तर पार पृथ्वीच्या जन्मापासूनच 'लग्न' हा चर्चेचा विषय राहिला असला पाहिजे. अखंड स्त्रीजातीसाठी तो फक्त विषयच नसून निमित्तही राहिला आहे. कारण अगणित चर्चांना तिथे वाव मिळतो. 'सासुबाई जरा खाष्टच दिसतात', 'जेवताना आम्हाला आग्रह करायला कुण्णी कुण्णी आलं नाही बुवा' किंवा 'जावयाच्या गळ्यात सोन्याची साखळी घातली आहे की नुसतीच पातळ तार हो', 'अरे! तू ते हिरव्या घाग-यातलं पाखरू पाहिलंस का रे', 'ही दोघं अशी मिरवताहेत की लग्न नक्की कुणाचं आहे याबद्द्ल शंका वाटावी'… या आणि अशा कित्येक टोमण्यांनी चर्चा सुरु होतात; आणि सभागृह खाली करण्याच्या घंटेपर्यंत रुळ बदलत सुरूच राहतात.

इथे 'सभागृह रिकामी करण्याची घंटा' हा पुणेरी लग्नांमधला आहेराइतकाच महत्त्वाचा घटक आहे. ती टाळताही येत नाही आणि पाळतानाची कसरत चुकवताही येत नाही. मुळात 'पुण्याकडची लग्न' ही पुण्याइतकीच पुण्याबाहेरच्यांना टीकास्पद वाटतात. 'टेबलावर ठेवलेल्या रुखवताला' मराठवाड्याकडच्यांनी जर 'देवघेवीच्या वस्तू' म्हणून पाहिलं, तर कसं जमायचं हो? सांगली-कोल्हापूरकडून आलेल्या पाहुण्यांना पुण्याची लग्नं जेवणातल्या साखरेमुळे सपक लागतात. व-हाड-खानदेशकडे मिरवणूक आणि वरातीला जेवढं महत्त्व आहे, तेवढं पुण्यात वधु-वरांनाही नसतं!

बाकी, अखंड लग्नात वधुवरांना कोण मोजतं म्हणा! पुरेशा नोटा मोजून 'इकडे बघा' असं खेकसणा-या जन्माने पुण्याच्या फ़ोटोग्राफ़रला तेवढा त्या उभयतांमधे भलताच 'इंटरेष्ट' असतो. अल्बमकरता त्या द्वयांना व्यायामाचे जे धडे तो देत असतो, ते त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या आप्तेष्टांच्या करमणुकीचा विषय ठरतात. एकदा पाठीला पाठ लावून एकमेकांच्या हातात हात घातलेल्या नवदाम्पत्याला फ़ोटो काढून झाल्यावर सोडवायला तिघांना बरेच प्रयत्न करावे लागल्याच्या उदाहरणाचा मी स्वत: साक्षिदार राहिलो आहे.

बरं… लग्नात केवळ फ़ोटोग्राफरच आक्रमक असतात असंही नाही. लग्न 'लावण्याची' मुख्य जबाबदारी ही गुरुजींची असते. शाळेत 'स्कोरिंग' साठी घेतलेली संस्कृत आणि लग्नात श्लोकपठण करणा-या गुरुजींची संस्कृत यात तेवढाच फरक आहे, जेवढा तो लग्नात मुलाकडच्यांनी केलेल्या मागण्या आणि मुलीकडच्यांनी त्या पुरवण्यामध्ये असतो.

या मागण्या खरंच गूढ असतात! 'आम्हाला काही नको' असं म्हणणारी मंडळी 'बरं झालं, आपण मंगळसुत्राबरोबर पाटल्याही केल्या; नाही तर ही अगदीच रिकाम्या हाती उभी राहिली असती' असं खुसपुसतात. 'मुलाला व्यसनं नसावीत' अशी अपेक्षा ठेवणा-या वधुपित्यांना कित्येकदा आपली कार्टी तिच्या ऑफिसच्या पार्टीमधे आचमनं करते, याची जाण नसते. अशा गोष्टींची ठोस अथवा अर्धवट माहिती असलेल्या आप्त-नातलगांना लग्नविधींच्या वेळी आपापसात किस्से सांगण्यात वेळ घालवता येतो.

लग्नविधी हे तर कित्येकांच्या वादाचाच मुद्दा असतात. मंगलाष्टकांनंतर अक्षता टाकल्या म्हणजे 'लग्नं लागलं' अशी उपस्थितांची समजूत असते. गुरुजी मात्र 'कन्यादाना'लाच 'लग्न' म्हणतात. सप्तपदी आणि फेरे हे करवल्यांनी नटखट हसत उगीचच एकमेकींना टाळ्या देण्यासाठी ठेवलेल्या पद्धती असाव्यात. वराने लग्नाच्या दिवशी वधूला सूर्य का दाखवायचा असतो आणि त्यानिमित्ताने प्रत्यक्षात ती दोघं आपापसात काय बोलतात, हे संशोधनाचे विषय ठरू शकतात. कित्येक विधींमधे फोटोग्राफर गुरुजींनाच मंत्र म्हणण्यापासून ब्रेक देतो. सूनमुखाच्या वेळी त्या आरशाचा कोन असा काही धरावा लागतो की ती वरमाय, गालातल्या गालात खुश होणारा तो वर आणि आरशात पहावं की पाण्यात, अशा गुंतागुंतीत अडकलेली ती सौभाग्यकांक्षिणी हे कोणाकोणाची नजर चुकवत असतात, कोण जाणे!

हे सगळे विधी उरकतात, अक्षतारुपी आशीर्वाद दिले जातात आणि मग सुरु होते, ती धावपळ! ही धावपळ म्हणजे खरोखर धावापाळच असते. प्रत्येकजण वधुवरांना भेटण्याच्या रांगेत जास्तीत जास्त पुढे पोहोचण्याचा आटापिटा करतो. त्यात अपयशी ठरणारे बरेच जण मग रांगेत पुढचा नंबर मिळवलेल्यांमधे आपल्या ओळखीचा मासा गळाला लावायचा प्रयत्न करतात. यातले काही जण अर्ध्या दिवसात लग्न आटोपून पुन्हा ऑफिसमध्ये हजेरी लावणार असतात; तर काही जण पुन्हा आतल्या गोटातल्या चर्चा पुढे सुरु ठेवणार असतात. बाकीचे सर्व जण मात्र वधुवरांना आशीर्वाद देण्याची औपचारिकता पूर्ण करून आपल्या जिभेचे चोचले पुरवायला जेवणात काय काय असेल, या विचारानेच आपली भूक वाढवत असतात.

तर अशी ही रांग आशीर्वाद देत आणि फ़ोटो काढून घेत जेवणाच्या पंगतीत परिवर्तीत होते. आणि मग निरोप घेऊन आपापल्या संसारात रुजूही होते. वधुवरांची पंगतही मग उखाणे घेत आणि घास भरवत पार पडते. पुढे लक्ष्मीपूजनानंतर विरहाश्रू अनावर  होतात. 'उद्या फोन करीनच' असं म्हणत मुलीची आई आपले डोळे पुसत, आपला मेकअप बिघडला तर नाही ना, याची हळूच खात्री करून घेते. मुलीचे वडील 'कार्टी सासरी काय दिवे लावते', या चिंतेने तिला घट्ट बिलगतात. वरमाय आजपासून आपली सुट्टी झाल्याचा आनंद स्तब्ध चेहे-याआड लपवून ठेवते. मुलाचे वडील 'दिवटं मार्गी लागलं', या समाधानात आपल्या सारखाच आता तोही संसारी झाल्याचे आविर्भाव व्यक्त करतात. स्वत: वधू परंपरेप्रमाणे रडत असते आणि आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय, याची कल्पना नसलेला नवरदेव आतल्या आत फुटत असलेले लाडू गिळून आपल्या विवाहीतेला धीर देत असतो.

हो! म्हणजे त्या भोळ्याला आपल्या भविष्याची जराही जाणीव नसते. युगानुयुगं चर्चा होऊनही कित्येकांना न सुटलेल्या या 'लग्न' नामक कोड्यात तो कसा  गुरफ़टणार, याचा अंदाजही त्याला आलेला नसतो. आणि आत्तापर्यंत आजूबाजूला होत असलेल्या चर्चा संपून आपण न संपणा-या संभाषणात भाग घेत आहोत; सुरु होण्यापूर्वीच वादात आपण यापुढे कायम शाब्दिक माघार घेणार आहोत, या वास्तवापासून तो अजूनही काही इंच दूर असतो. अर्थात, 'संसार' नामक एका अपरिचित आयुष्यात तावून-सुलाखून निघण्यासाठी तो जणू उडीच घेत असतो…


Sunday, June 28, 2015

कोई लौटा दे मेरे…

                                                                                                                   - शेखर श. धूपकर

परवा संध्याकाळी… नव्हे रात्रीच, एका निनावी क्रमांकावरून मला फोन आला. "काय अण्णा? ओळखलंस का?" … "अण्णा"… कित्येक वर्षांनी ही हाक माझ्या कानावर पडली होती. आठवणींची पानं निदान बारा-एक वर्षांनी मागं चाळली  गेली. पण "ओळख… ओळख…" म्हणणारा तो इतका आपुलकीचा आवाज कसलाच संदर्भ देत नव्हता.

"अरे, मी आदित्य… आदित्य बर्वे". मी स्तब्ध झालो. इतक्या आठवणी आणि इतक्या घटना डोळ्यांसमोरून झरझर सरकल्या! बर्व्याशी निवांत गप्पा झाल्या. त्या गप्पांनी मधल्या एका तपाचा आणि हातून निसटून चाललेल्या आत्ताच्या क्षणाचा विसर पाडला होता. 'अड्ड्यावर भेटू' म्हणत पुन्हा आम्ही वर्तमानात आलो. फोन संपला होता; पण मन कुठेतरी त्या कालयंत्रात अडकून परतायचं विसरलं होतं.

त्या रात्री निजल्यावरही फक्त आदित्य, आमचं संभाषण, ते दिवस… हे सगळंच डोक्यात सुरु राहिलं आणि मध्यरात्र उलटून गेल्यावर, खूप उशीरा कधीतरी, न झोपलेला मी खडबडून जागा झालो. मला आलेली ही जाग झोपमोड करणारी नव्हती; तर माझे डोळे सताड उघडणारी होती. आपण बारा वर्षांपूर्वी जगात असलेल्या आणि सध्या जगत असलेल्या परस्पर विरोधी आयुष्यातली तफावत दाखवून देणारी जाग होती ती!

'किती सुंदर दिवस होते नाही ते!', असं आपल्याला कायमच वाटतं आणि पुढेही वाटत राहील; पण 'आपण आपल्यालाच तर विसरत चाललो नाहीत ना?' असा जाब विचारणारी जाग मला त्या रात्री आली. मी पूर्णपणे निरुत्तर होतो; आणि माझी तशी अवस्था मला हतबल करत चालली होती.

खरंच किती सुंदर दिवस होते ते! आम्ही सगळे मित्र नुकतेच वेगवेगळ्या कंपन्यांमधे रुजू झालो होतो. मोबाईलची क्रांती तेव्हा व्हायची होती; पण म्हणून आम्हाला संपर्कात रहाण्याची कोणतीच अडचण तेव्हा येत नसे. सोमवार ते शुक्रवार नवं काम, नवं जग आणि नव्या स्पर्धेला आपलंसं करता-करताही शनिवार-रविवारचे बेत ठरत. हे बेत कुठल्या ना कुठल्या किल्ल्यावर ट्रेक करण्याचेच असत!

ट्रेक्सही कसे… तर, महामंडळाच्या लाल डब्याला तेव्हा आर्थिकदृष्ट्या पर्याय नव्हता; आणि तसा शोधण्याची गरजही आम्हाला वाटत नसे. पायथ्याच्या गावी पोहोचल्यावर गावातल्या फोनवरून घरी निरोप दिला जायचा आणि मगच चढाईला सुरुवात व्हायची. ट्रेक्स म्हणजे सर्व बंधनांतून मुक्तता असे. जुनी-नवी पण गुणगुणण्या जोगी मराठी-हिंदी गाणी,त्यापूर्वी केल्या गेलेल्या ट्रेक्सच्या गप्पा, किल्ल्यातल्या पडक्या मंदिरात किंवा वाड्यात स्वयंपाक आणि मुक्कामाच्या सोयी, उपलब्ध असल्यास नैसर्गिक तळ्यात मनसोक्त विहार… खरंच किती स्वच्छंदी दिवस होते ते…!

ज्या शनिवार-रविवारी ट्रेक्स नसत, तेव्हा एखाद्याच्या घरी जमून गाण्यांच्या मैफिली, गप्पांचे अड्डे, पत्त्यांचे डाव रंगत. आजच्या सारख्या हॉटेलमधल्या ओल्या-सुक्या पार्ट्यांची ऐपत आणि पद्धत त्यावेळी श्रमपरिहार किंवा मित्रांच्या कट्ट्याला पर्याय झाले नव्हते; पण त्या भेटींमधे अतोनात समाधान असे.

बारा वर्षांपूर्वी जसे मित्र होते, तसेच नातेवाईकही असत. काका-मामा-आत्या-मावशी ही लोकंही कुटुंबाचा आणि आयुष्याचा एक अविभाज्य भाग असत. मुद्दाम आमच्यासाठी मेजवान्यांचे बेत आखले जात. मग तशी कुटुंब एकत्र येऊन हास्य-विनोद करत भरपेट होत. चुलत-मामे-आत्ते-मावस भावंडं तेव्हा एकमेकांच्या घरी असत. सुट्ट्यांंमधे धुडगूस चाले. लग्न-मुंजींचे प्रसंग त्यांच्या ओळखी करून घेण्याची निमित्त्य तेव्हा झाले नव्हते.

बारा वर्षात आयुष्य एवढं बदलावं? आई-बाबांबरोबर सुट्टीच्या दिवशी एखादं नाटक किंवा 'आयुष्यावर बोलू काही' इतकं अवघड होत नसे. इतकंच कशाला? रात्रीची जेवणंही एकत्र होत. वाढदिवस हे स्वत: बाहेर जाण्याऐवजी आप्त-स्वकीय घरी जमून साजरे होत. अशा प्रसंगी पिझ्झा-पाश्त्या ऐवजी आईच्या हातची गरम गरम पुरणपोळी सुखद वाटे. तसे त्याकाळी कालनिर्णयवरचे सगळेच सण साजरे होत. आनंदाच्या चौकटी सर्वव्यापी होत्या.

दूरदर्शन प्रामुखाने सातच्या बातम्या आणि फावल्या वेळात मनोरंजनाचं पूरक समाधान होता. सतराशे साठ वाहिन्यांवरून चालणाऱ्या डेली सोप्स तेव्हा दैनंदिनीची गरज होऊन बसल्या नव्हत्या. प्रत्येकाने डोकं खुपसून बसायला मोबाईल नव्हते; पण त्यामुळे भावनिक धागे घट्ट विणलेलेल होते.

पहिला पाऊस 'भिजून' अनुभवला जायचा; गप्पांच्या भेटी अडीच रुपयाच्या कटिंगवर भागत; पुण्यातली पर्वती आणि मुंबईची दादर-चौपाटी ही लहानग्यां सोबत संध्याकाळ घालवण्यासाठी पर्वणी असत. मैदान, त्यावर क्रिकेट आणि दोन डावांच्या मध्ये बर्फाचा गोळा तेव्हा इतिहासजमा झालं नव्हतं. चालत-फ़िरणं, रस्त्यात भेटलेल्यांची विचारपूस करणं असं सगळं आजच्या इतकं दुर्मिळ झालं नव्हतं. प्रत्येकाला काही ना काही छंदं आणि ते जोपासायला वेळ उपलब्ध होता.

बाप रे! बारा वर्षांच्या या तपश्चर्येने माझ्याकडून काय काय हिरावून घेतलंय? बरं; त्या बदल्यात या तपाने काय दिलं? तर कदाचित फक्त ताप, चिडचिड, धावपळ! मित्र, कुटूंब, नातलग, छंद, वेळ हे सगळं पैशाने कसंबरं 'रिप्लेस' होईल? बर; हा वाढलेला पैसा तरी सुख-समाधान मिळवून देतोय का? मला सांगा, दिवाळीच्या फ़राळाची ताटं व्हॉटसेपच्या 'फॉरवर्ड्स'नी कशी बरं शुभेच्छा देतील? आजी-आजोबांचे आशीर्वाद आणि हातावर ठेवलेली शंभराची नोट तोंडाला फासल्या जाणाऱ्यां केकसमोर कसे बरं फिके वाटतील?

परवा झालेली झोपमोड मला स्वत:ची ओळख करून देऊन गेली. उशीरा का होईना, पण त्या रात्री मी गाढ झोपलो. बदल आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जातात खरे; पण पैसा आणि धावत्या जगात होणारी रखड हातून गेलेले जगायचे क्षण पुन्हा परत मिळवून देत नाहीत; … ते विकतही घेता येत नाहीत.

त्याच रात्री मी  ठरवलं… पुन्हा चार पावलं मागं जायचं. आयुष्यातली दोन भौतिक ध्येय कमी करायची; पण 'जगायचं'. स्वत:साठी वेळ काढायचा; छंद जोपासायचे; लेख लिहायचे; प्रसिद्ध करायचे; तुमच्या कमेंट्स मिळवायच्या; त्यांवर चर्चा करायच्या; विवाद करायचे; आणखी नवे विचार मांडायचे; पुन्हा लेख… जगायचं… पुन्हा जगायचं!

Sunday, May 27, 2012

जुनं ते...

(सुमारे वर्षभरापूर्वी 'अण्णां'वर एक लेख लिहिला होता. काम, अभ्यास, संसार आणि या सगळ्यांहून महत्त्वाचा म्हणजे आळस या कारणांमुळे त्यानंतर माझ्याकडून लेख लिहिलाच गेला नव्हता. पण मी लेख लिहावा, म्हणून मला प्रत्यक्ष, फोनवर किंवा ईमेलवर उद्युक्त करणा-या सगळ्यांच्या इच्छेला मान देऊन आज पुन्हा एकदा प्रयत्न करतो आहे. माझ्याकडून असेच आणि अधिक चांगले लेख लिहून घेण्याची जबाबदारी तुम्हा वाचकांची आहे. वाचत रहा. धन्यवाद!)


परवाच्या रात्री एका हॉटेलमध्ये 'मित्र-परिवारांसोबत' सहभोजनाचा आनंद घेत होतो. सुमारे सव्वा वर्षापूर्वी माझे 'दोनाचे चार' झाल्यापासून 'मित्र-परिवार' या शब्दद्वयीची व्याख्या जरा बदललीय. मित्रमंडळी किंवा मित्रमैत्रिणी इतकी साधीसरळ न राहता, ती व्याख्या आता 'केवळ परिवार असलेले मित्र' इतकी व्यापक झाली आहे. हो! म्हणजे 'काळ बदलला'चा अर्थ जसा 'काळानुरूप सगळं म्हणजे सगळं इकडचं तिकडे झालं' इतका व्यापक आहे, तितकाच तो बदलही व्यापक असतो. आणि नव्या काळातले असे बदल आपल्याला जुन्या काळाच्या आठवणींनी भावूक करत असतात

...असो! तर, आम्ही सहभोजनाचा आनंद लुटत होतो. एवढ्यात पलिकडच्या टेबलावर कोण्या अज्ञात भोजकाचा भ्रमणध्वनी खणखणू लागला. तो घंटाध्वनी अर्थात रिंगटोन परिचयाचा वाटून मेंदू जुन्या आठवणींच्या फडताळात शिरला. क्षणार्धातच मेंदूने आपण (अजूनही!) तरुण असल्याची खात्री करून देत या शोधाचा छडा लावला. कोण्या एकेकाळी दूरदर्शनवर लागणा-या संध्याकाळच्या सात वाजताच्या बातम्यांची शीर्षक-धून होती ती!

आता, खरंतर सातच्या 'त्या' बातम्या अजूनही प्रदर्शित होत असतीलही; पण 'दूरदर्शन' एवढी एकच वाहिनी असण्याचा जमाना गेला आता. ... असेच घडतात बदल! आणि आपण खापर फोडतो काळावर! तो बदलत नाहीच; बदलतो आपण आणि म्हणतो, "काळ किती बदलला!"!

तर, त्या रिंगटोननी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि तशी ती देतच राहिली. त्या काळात दूरदर्शन संचाला 'रिमोट कंट्रोल' नसे. अर्थात, निव्वळ आवाज कमी-जास्त करण्यासाठी त्याची गरजही भासत नसे. विविध वाहिन्यांवरून सासू-सुना (आणि आई-बहिणी!) काढण्याइतका जमाना पुढारलेला नव्हता तेव्हा. एकच वाहिनी, ती ही चोवीस तासांसाठी नाही, आणि त्यावर निखळ मनोरंजनाचे माफक कार्यक्रम, एवढीच दूरदर्शनची व्याप्ती होती. दर रविवारचा सिनेमा हे तर प्रमुख आकर्षण! बाकी रविवारी सर्वजण सकाळपासूनच दूरदर्शनसमोर बसत. बदललेल्या जमान्यात सध्या हे रोजचंच चित्र आहे. सुंदर गाण्यांच्या मोहक 'रंगोली'ने आणि रंगोलीचं सूत्रसंचालन करणा-या त्याहून अधिक मोहक हेमा मालिनीने रविवार उजाडत असे. नविन जमान्याला आश्चर्य वाटेल कदाचित, पण हेमा मालिनीची मोहकता आणि सौंदर्य तिच्या चेह-यावर  एकवटलेलं होतं. सहावारी साडीने संपूर्ण शरीर झाकल्यावर त्या पलिकडील मोहकतेला पुरेसा वाव मिळत नसावा कदाचित! बाकी त्यातली गाणीही काव्याला आणि संगीताला पूरक अशी असत. स्त्री-कलाकाराच्या कमीत-कमी कपड्यांत कवीच्या प्रतिभेचा तोकडेपणा झाकण्याचा प्रयत्न तेव्हा होत नसे. किंवा सर्वसामान्यपणे गाण्यांच्या चित्रीकरणांमधे त्या स्त्री-कलाकारांनीही आपली अब्रू स्वत:हून वेशीवर टांगून दिलेली नसे.

...असो! पुढे नाश्त्याला चार्ली चाप्लीन, लॉरेल-हार्डी, एखाद दोन कार्टून्स सोबतीला असत. अर्थात, देवादिकांना अकरा-बाराच्या सुमारास 'रामायण-महाभारता'तली पात्रे सादर करायची असल्यामुळे गणेश, हनुमान, भीम आदींनी स्वत:ची कार्टून्स होऊ दिलेली नव्हती. दुपारच्या जेवणानंतर एखादा मनोरंजक चित्रपट म्हणजे कुटुंबासाठी मेजवानी असे. हो! तेव्हा चिल्या-पिल्यांसोबत आणि आजी-आजोबांनाही रुचतील असेच चित्रपट प्रदर्शित होत असत. कुटुंबाची पांगापांग करण्याची वेळ आणणारे चित्रपट 'जुन्या' काळी सर्रास प्रदर्शित होत नसत.

तसा, जमाना झपाट्याने बदलण्यात दूरदर्शनच्या संचाने मोठा हातभार लावला असला, तरी जमान्यात झालेले बदल हे केवळ 'दूरदर्शन' या एकाच परिमाणावर मोजणं असयुक्तिक ठरेल. दैनंदिनी, सवयी, गरजा, छंद, आवडी-नावडी, उपलब्धता या बरोबरच चंगळवादाच्या व्याख्याही बदलत्या काळाने बदलून टाकल्या. 

दोन दिवस पाणी न आल्याने झालेला नाईलाज किंवा बाबांना कामाच्या ठिकाणी मिळालेली बढती यापलिकडे कोणत्याही कारणास्तव लहानपणी हॉटेलमध्ये जेवल्याचं मला आठवत नाही. आठ आण्यांची मेलडी किंवा फार तर फार तीन-चाकी सायकल ही घराबाहेर पडल्यावर बाबांकडे करण्याच्या हट्टाची परिसीमा होती. बाकी, 'आठ आणे' ही सुद्धा आठवणीत जमा झालेली एक बाब होऊन बसली आहे. कामावरून घरी येताना बाबांनी बांधून आणलेले प्रत्येकी दोन बटाटेवडे ही बालपणीच्या अत्यानंदाची ओळख होती.

अरुंद आणि कधीकाळी बांधलेले रस्ते, त्यावरून क्वचित कधीतरी फेरफटका मारणारी एस.टी.ची लाल बस, श्रीमंतांच्या सोयीसाठी इकडून-तिकडे करणा-या रिक्षा ही दळणवळणाची व्याख्या होती. कुटुंबात प्रत्येकी एक याप्रमाणे वाहनं बाळगणा-या आजच्या जमान्याला हा इतिहास कदाचित फारसा रुचणार नाही. घरात दूरध्वनीचीच जिथे वानवा, तिथे शाळकरी पोराकडे मोबाईल कुठून येणार?

शाळेत किंवा पुढे महाविद्यालयातही मुलांना फक्त मित्र आणि मुलींना फक्त मैत्रिणीच असत. गर्लफ्रेंड नसलेल्या दोघांना नाईलाजाने एकमेकांची सोबत तेव्हा द्यावी लागत नसे. परीक्षेचा निकाल, इतर एखादं यश किंवा मनाला लागलेली एखादी गोष्ट व्यक्त करण्याचं पाहिलं ठिकाण म्हणजे 'आई' असे. आपल्याला मिळालेल्या कोणत्याही भेट वस्तूवर आपल्या इतकाच आपल्या भावंडांचाही हक्क असे; आणि ती भेटवस्तू म्हणजे सामान्यात: खाऊच असे.

दुपारची झोपमोड करायला येणारा पोस्टमन आणि त्याने आणलेलं पत्र राग आणि वैतागापेक्षा आकर्षणाचे विषय होते. संध्याकाळचा तास-दीडतास हा मैदानावर थकून परत येण्यासाठी राखीव ठेवलेला असे. वाढदिवसाच्या दिवशी औक्षवण आणि आईने घरी केलेलं पक्वान्न ही तो दिवस साजरा करण्याची ज्ञात पद्धत होती. दिवे मालवून, मेणबत्त्या फुंकून अंधार करण्याऐवजी तुपाच्या निरांजनाचा प्रकाश वाढदिवसाचं मुख्य प्रयोजन होता. मैत्रीदिन, प्रेमदिवस, रोज डे असल्या संकल्पना तेव्हा अजून जन्म घ्यायच्या होत्या. रक्षाबंधनाला आवर्जून सुट्टी घेण्यापेक्षा शाळेत आपल्या हातावर किती जास्त राख्या आहेत, हाच स्पर्धेचा आणि अभिमानाचा भाग होता.


घरांच्या किमती,  पगारांच्या रकमा, सोन्या-चांदीचे भाव, पेट्रोल-डिझेलचे दर, नविन कपडे घरात येण्याची कारणं आणि त्यांच्या किंमती, मुंबईच्या लोकलची गर्दी, मुलींच्या अंगप्रदर्शनाचं प्रमाण, घटस्फोटांचे दर या आणि अशा कित्येक परीमाणांमध्ये पडलेल्या फरकाचा परिणाम बदललेल्या जमान्यात झालेला दिसतो. काळानुरूप झालेले हे बदल योग्य की अयोग्य अथवा आवश्यक की अनावश्यक हा निराळा विषय होऊ शकतो. पण असे बदल घडत राहतात आणि भविष्यातही ते दिसून येणारंच! महत्त्वाचा भाग असा आहे की, मोबाइलच्या 'त्या' रिंगटोनसारखं एखादं कारण आपल्याला आपल्यातच झालेल्या बदलांकडे वळून पाहण्यास उद्युक्त करतं; आणि भूतकाळाच्या त्या अलबमवरून अशी नजर फिरवून झाल्यावर स्मिताहास्याबरोबर आपल्या ओठांतून शब्द बाहेर पडतात... "काळ किती बदलला; नाही!!!"

Sunday, August 28, 2011

"मी (विरुद्ध) अण्णा हजारे"

- शेखर श.धूपकर

        १५ ऑगस्टची 'सुट्टी' उपभोगून मी १६ तारखेला जेव्हा दूरदर्शन संच सुरू केला, तेव्हा 'अण्णा हजारेंच्या' अटकेची बातमी मेला समजली. मला रागच आला जरासा...; पण मग मी स्वत:ला शांत करत इतर कोणत्याही बातमीप्रमाणे ती ही पाहत चहा रिचवला. संध्याकाळपर्यंत मात्र माझ्यात जोष संचारला आणि मग 'मी अण्णा हजारे' लिहिलेली एक गांधीटोपी मिळवून मी माझ्यासारख्याच इतरांबरोबर 'रस्त्यावर उतरलो'.

        हा अनुभव वेगळाच होता. हो! म्हणजे दीडशे वर्ष आपल्यावर राज्य केलेल्या ब्रिटीशांच्या भूमीवर भारतीय क्रिकेटमधील वीर पानिपाताचा अनुभव घेत असताना देशातल्या रस्त्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिरंगा फडकताना पाहणं, ही तशी ऐतिहासिक घटनाच होती. घटनेच्या त्या ऐतिहासिक मूल्यामुळेच असेल कदाचित; पण मला कसलं तरी स्फुरण चढलं होतं. ते देशभक्तीचंच असावं, असा तर्क लावून मी ही माझ्यासारख्याच इतरांनी दिलेल्या 'भारत माता की...' च्या घोषणेला 'जय' असं ओरडत होतो.

        त्या संध्याकाळच्या जोषामुळे आलेला थकवा नाही म्हणायला रात्री हाडांमधून जाणवत होता. निवांत झोप झाल्यावर मात्र अण्णांचा उपोषणाचा सुरु असलेला हट्ट पाहून मला पुन्हा जोम चढला. आज 'मी' कालच्या गांधीटोपीच्या जोडीला पांढराशुभ्र सदरा परिधान केला. ऑफिसातल्या आणखी चार-पाच जणांनाही 'मी' माझ्यासोबत 'रस्त्यावर ओढलं'. "जन लोकपाल" नामक कोण्या एका बिलाचं समर्थन आम्ही सगळे करत होतो.

        हे सगळंच इतकं सुखद होतं की, दिवसें-दिवस माझ्यातल्या देशभक्तीला निरनिराळ्या वाटा मिळू लागल्या होत्या. म्हणजे आज मेणबत्ती घेऊन मूक पदयात्रा, तर उद्या दुचाकीवरून फेरी; परवा भर चौकात धरणं, तर तेरवा मी चक्क दिल्ली गाठली. दिल्लीतलं वातावरण तर रोमांचकारी होतं. पहावं त्याच्या डोक्यावर गांधीटोपी आणि अंगात पांढरेशुभ्र सदरे! इथे कुणाला धर्म नव्हता की जात; भाषा नव्हती की प्रांत; पक्ष नव्हता की मतभेद! सगळेच भारतीय!!! अण्णांच्या नावाच्या या टोपीतली जादू ती घातल्याशिवाय अनुभवणं निव्वळ अशक्य आहे. 'मी अण्णा हजारे' या तीन शब्दांच्या उच्चारातली ताकदही ती न उच्चारलेल्याला कशी समजावी???

        'मी अण्णा हजारे' असं लिहिलेली ती टोपी डोक्यावरून काढून मी तिच्याकडे कुतूहलाने पाहू लागलो; आणि तेवढयात, विजेचा झटका बसावा, तसं माझं डोकं अचानक ठिकाणावर आल्याची जाणीव मला झाली. माझं कुटुंब, माझं ऑफिस, माझा पगार, तो वाढवण्याची माझी जिद्द, माझा आनंद, तो उपभोगण्याच्या माझ्या पद्धती या सर्वांची आठवण मला झाली आणि मी तडक घर गाठलं.

        दुसऱ्या दिवशी, डोक्यावर चढलेलं देशभक्तीचं खूळ (टोपीसकट) उतरवून मी दैनंदिनीत व्यस्त झालो. ऑफिसला जाताना झालेला उशीर कमी व्हावा, या प्रयत्नात कोणताही सिग्नल मी पाळला नाही. त्यापैकी एकावर वाहतूक-मामाने अडवल्यावर शंभराची नोट पटकन त्याच्या हातावर टेकवत मी केलेल्या चुकीची दुरुस्ती केली. (त्या नोटेवरच्या गांधींनीही त्यांची टोपी उतरवून ठेवलेली होतीच!) ऑफिसमध्ये पोहोचल्यावर पगार वाचवण्याच्या अपेक्षेने दोन(च) दिवस सुट्टी घेतल्याचा आव आणून उर्वरीत तीन दिवसांची रजा नोंदवली नाही. पुढे, परदेशगमनाच्या संधीच्या आनंदात, पासपोर्ट परीक्षणासाठी आलेल्या हवालदाराला दोनशे रुपयांची 'फी' मी 'खुशीने' दिली. परदेशाच्या प्रवासासाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदीवरचा कर चुकवावा, म्हणून त्या पावतीशिवायच खरेदी केल्या. दरवेळेप्रमाणे, नोंद नसलेल्या ग्यास-सिलिंडरसाठी तो आणून देणाऱ्या दूताचा खिसा मी 'तसाच' 'जड केला'... आणि, रात्रीच्या जेवणाच्या वेळी सरकारवर यथेच्छ टीका केली.

        थोडक्यात काय..., माझ्यातला 'मी' परत आल्याचा अनुभव घेत घेत देश, सरकार, व्यवस्था, यंत्रणा, जनता, भ्रष्टाचार (आणि बायको!) यांच्यावर तोंडसुख घेण्याचा परवाना मी परत मिळवला. बाकी, रात्रीच्या बातम्या पाहताना एक गोष्ट मला जरा खटकलीच... अण्णांची टोपी मात्र कोरीच होती!!!

Sunday, May 29, 2011

दर्शन

                कोल्हापूरची महालक्ष्मी हे आमचं कुलदैवत. महिलांना गाभाऱ्यात नसलेल्या प्रवेशावरून नुकत्याच झालेल्या गदारोळाने मन अगदी सुन्न झालं आणि देवीच्या दर्शनाला जायचं मी ठरवलं. खरंतर, या उद्विग्नतेचा, महालक्ष्मी आमची कुलदेवता असण्याशी काडीचाही संबंध नव्हता. आणि महिलांच्या प्रवेशाबद्दलच बोलायचं, तर त्यांना तो मिळत नसे, हीच माझ्यासाठी 'बातमी' होती.

                ... तर, मी गाडी काढली आणि तडक कोल्हापूर गाठलं. शुक्रवारचं ऑफिस उरकून निघालो असल्यामुळे रात्री उशीर झाला होता. त्यामुळे, आता सकाळीच दर्शन होणार, हे निश्चित होतं. अस्वस्थतेमुळेच असेल कदाचित पण शांत झोप लागली नाही आणि पहाटे पावणे-पाच वाजता मी मंदिरात प्रवेश केला.

                सकाळी खूप लवकरची वेळ असल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता. मंदिराच्या कमानीत असलेली सुरक्षा यंत्रणा गाढ झोपेत होती. मी वाकून पहिल्या पायरीला स्पर्श केला आणि मंदिरात प्रवेशकर्ता झालो. वर्षानुवर्ष येऊनही आज मी महालक्ष्मीचं मंदिर नव्यानेच पाहत होतो. गर्दी नाही; रेटारेटी नाही; रांग तोडणा-यांना शिवीगाळ नाही; उकाड्याचा त्रास नाही की कसला वैताग नाही. देवळातले ते दगडी खांब आणि त्यांवरचं कोरीवकाम प्रसन्नपणे ती शांतता उपभोगत होते. तरीही मी नेहमीच्याच वाटेने गाभा-यापर्यंत पोहोचलो.

                दरभेटीत देवीच्या इथून होणा-या दर्शनापेक्षा आजचं दर्शन खूपच वेगळं असणार, हे तर निश्चित होतं. मी जोडलेल्या हातांनी गाभा-यासमोर उभा राहिलो आणि थबकलोच! पुन्हा पुन्हा डोळे चोळून आणि स्वत:ला चिमटे काढून पाहिलं; पण नाही... गाभा-यात महालक्ष्मीच नव्हती!!! मला काहीच समजेना! सकाळची पूजा करायला आलेले पुजारी महोदय आपली पूजा सवयीप्रमाणे उरकत होते. पण ते जिची पूजा करत होते; तीच तिथे उपस्थित नव्हती. माझी बेचैनी कमी होण्याऐवजी शिगेला पोहोचली. त्याच मन:स्थितीत मी प्रदक्षिणा घातली; आणि मंदिरातून बाहेर पडू लागलो.

                इतक्यात मला कसलीतरी कुजबूज कानावर पडली. देवळात भिंतीलगत अंधारात एक आजीबाई काहीतरी पुटपुटत असल्याची जाणीव मला झाली. त्या मलाच तर काही म्हणत नाहीत ना, अशी शंका येऊन मी त्यांची विचारपूस केली. 'हेच माझं घर' असं त्या म्हणाल्या. रोज लाखोनी लोकं दर्शनाला येतात; पण त्यांच्याकडे लक्ष गेलेला मी पाहिलाच होतो, असं त्यांना वाटत होतं.

                मला परत जाण्याची घाईही नव्हती आणि अस्वस्थता काही केल्या कमी होत नव्हती. त्यामुळे मी न ठरवताच त्या आजींपाशी जाऊन बसलो होतो. न राहवून मी जेव्हा 'आत देवीच दिसली नाही', असं त्यांना म्हणालो; तेव्हा त्या नुसत्याच हसल्या. खरं होतं म्हणा!!! माझ्या अशा बोलण्यावर थट्टेशिवाय कोणीही काय प्रतिक्रिया दिली असती... मी ही जरा वेळ शांतच राहिलो.

                काही वेळाने आजीबाईच म्हणाल्या, "विठू, साई, भवानी असे सगळेच असतात रातच्याला इथं. आम्ही तशा फारशा गप्पा मारत नाही; पण सगळ्यांचीच दु:ख एकमेकांना ठाऊक आहेत. बोलणार तरी काय? आणि कोणाला? ... तो साई... लई श्रीमंती पाहतोय. आयुष्यभर फकीर म्हणून जगला; आणि आता... आता सोन्याशिवाय काहीच पहायला मिळत नाही, म्हणतो. भवानेला दहा वेळा इचारलं, तर लेकरं भेटायलाच येत नाहीत, एवढंच बोलते. त्यातल्या त्यात विठूचीच परिस्थिती आमच्यात बरी! श्रीमंती नाही पाहिली त्यानं फारशी; पण दारिद्र्यातही पुष्कळ प्रेम मिळालं त्याला..."

                आजीबाई बोलत होत्या आणि मी मान डोलवत होतो. मधेमधे 'मी ऐकतोय' एवढं पटवून द्यायला हुंकार देत होतो. आजीबाईंना कदाचित बोलायला कुणीतरी हवं होतं; आणि मी 'आयताच गावल्यामुळे' त्यांना कंठ फुटला होता. मी मात्र अजूनही कसल्या तरी शोधात माझीच अस्वस्थता वाढवत होतो. बोलता बोलता आजीबाईंनी त्यांच्या हातातला अर्धा पेढा माझ्यापुढे केला; मी ही तो 'प्रसाद' म्हणून खाल्ला. पुन्हा त्यांच्या गप्पा आणि माझे हुंकार अशी जुगलबंदी काही काळ चालली.

                आता थोड्या वेळात उजाडणार, अशी जाणीव समोरच्याच झाडावरच्या चिमण्या करून द्यायला लागल्या होत्या. बाहेर कोणाची तरी चाहूलही लागायला लागली होती. 'आता आपण निघावं' असं मला वाटायला आणि अचानक आजीबाईंनी जागेवरून उठायला एकाच गाठ पडली. इतक्या वेळ अंधारात त्यांच्या चेह-यावरचे हावभावही नीटसे पहायला न मिळालेल्या मला त्यांनी नेसलेली हिरव्या रंगाची नेटकी साडी आश्चर्याचा धक्का देऊन गेली.

                "आताशा गर्दी व्हायला लागेल. मला जायला हवं.", असं काहीसं म्हणाल्या त्या. "तुझ्या सारखी खूप लेकरं येतात रोजच्याला; पण फारसं ध्यान मात्र कुणीच देत नाही", असा दिलासा त्यांनी पुन्हा एकदा मला दिला. मी ही त्यांच्या पायांना वाकून स्पर्श केला; तेव्हा "येत जा वरचे वर!", असं कळकळीनं म्हणाल्या त्या!!!

                मी पायात चपला घालेपर्यंत आजीबाई पुन्हा मंदिरात गेल्या होत्या. मी ही पुन्हा गाडीकडे वळालो. जेवणापर्यंत पुण्यात घरी पोहोचण्याचा हिशेब लावून मी दर्शनासाठी महादरवाजातून उलटा फिरलो आणि देवीला हात जोडून नमस्कार केला. महादरवाजातून थेट होणारं महालाक्ष्मीचं दर्शन मला सुखावून गेलं. इतक्या वेळची अस्वस्थता काहीशी कमी झाल्यासारखं वाटलं आणि मी एकदम गडबडलो.

                काही क्षण तिथूनच दर्शन घेत राहिल्यावर मात्र मी स्वत:शीच हसलो. हलक्या झालेल्या मनाने गाडीत येऊन बसलो आणि घराकडे निघालो. माझी नुसती अस्वस्थताच नाहीशी झाली नव्हती; तर तोपर्यंत न पडलेल्या कित्येक प्रश्नांची उत्तरं मिळाल्याची जाणीव मला झाली होती.

                पहाटे मला गाभा-यात देवी का दिसली नाही? तिने निघताना मला कसं काय दर्शन दिलं? आजीबाईंच्या नेटक्या हिरव्या साडीमागचं रहस्य काय? त्यांना नक्की कसली चिंता बोलकं करत होती? कुणाची तरी चाहूल लागताच त्या लगबगीनं मंदिराकडे का गेल्या? या प्रश्नांमध्ये 'त्या आजीबाई कोण होत्या?' या प्रश्नाचं उत्तर लपलेलं होतं. त्यांना रोज रात्री भेटायला येणारे विठू आणि साई हे पंढरपूर आणि शिर्डीचे होते, हे कोडंही आता उलगडलं होतं.

                एका अलौकिक समाधानाचा प्रत्यय मला जरी त्यावेळी येत होता; तरी एक खंतही जाणवत होती. आपण देवस्थानांकडे आज नक्की कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो? गाभा-यामध्ये खरोखरंच देवाने वास्तव्य करावं, इतकी प्रसन्नता असते का? 'देवावर श्रद्धा आणि त्याच्या अस्तित्त्वावर विश्वास ठेवतो', असं म्हणणारे किती जण देवाचं पावित्र्य जपतात? आपल्या आयुष्यात आदर्श जगतात?

                हे मला पडलेले प्रश्न आहेत; नव्हे... महालक्ष्मीने जाणीवपूर्वक विचारले आहेत. शोधुया सगळे मिळून त्यांची उत्तरं???

Wednesday, February 9, 2011

जगून तर पाहू...!!!

"कॉलेजची दोन वर्ष सरली... इतकं टापलंय तिला. एकदा विचारुया का सरळ!!!", हे आणि असले विचार प्रत्येक कॉलेजकुमाराच्या मनात कधी ना कधी येतातच. पुष्कळवेळा ते सत्यात उतरवण्यासाठी अतोनात धडपडही केली जाते. बऱ्याचदा ते तसे उतरतात; कित्येकदा नाही उतरत! वेगवेगळ्या वयात, समाजात, संस्कृतीत, परिस्थितीत अथवा मनस्थितीत असे बरेच मोह आपल्याला होत असतात. ...!!! 'मोह'... आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा कशाही बद्दल वाटणारं आकर्षण! काही मोह इतके मोहक असतात की, आपल्याला प्रयत्न केल्याशिवाय राहवत नाही. काही मात्र नुसतेच, दुरून डोंगर साजरे असतात. आता 'मोह' नेहमीच वाईट का? तर, कदाचित तसं नसावं. म्हणजे, मोह नक्की कसला होतो? आणि त्या मोहापायी आपण नक्की काय प्रयत्न करतो, यावर ते अवलंबून असणार.

सकाळी उठून धावपळ करून तीच नेहमीची आठ-चौदाची लोकल पकडायची; खाजवलेली पाठ नक्की आपलीच होती का आणि ती आपणच खाजवली का, हे ही समजू नये, एवढ्या गर्दीतून रोज ऑफिसपर्यंतचा प्रवास करायचा; दिवसभर मानेवर खडा ठेवून काम करायचं; बायकोनं दिलेला डबा रोज ठरलेल्या वेळी खायचा, भाजी टाकायची नाही; संध्याकाळी कितीही इच्छा नसली, तरी पुन्हा तेवढ्याच गर्दीच्या हवाली स्वत:ला करून देत घरी यायचं; अंगात त्राण उरलेले नसल्यामुळे कोणताही गोंगाट सहन होत नसूनही समोर सुरु असलेली 'डेली सोप' मुकाट गिळायची आणि अकरा-साडे अकराला स्वत:ला दिवाणावर झोकून द्यायचं.... वर्षानुवर्ष असंच करत राहिल्यावर एखाद दिवस झाला कामाच्या दिवशी घरी पडून राहण्याचा मोह, तर तो बेजबाबदारपणा ठरू शकतो का?

ऑफिसमध्ये दररोज मरमर काम करायचं; दिवसाच्या शेवटी एखादी 'थँक्यू'ची ई-मेल आणि वर्षाच्या शेवटी एखादं प्रमोशन एवढीच अपेक्षा मनात बाळगायची; दिवसभर काहीही काम न करणा-या शेजारच्या मिश्राच काम शेवटी आपणच जबाबदारी ओळखून हसत हसत करून द्यायचं; आदल्या दिवशी जास्तीची दाऊ पिऊन अचानक तब्ब्येत बिघडलेल्या त्याच्या सुट्टीमुळे आपलं, मुलीला, शाळेच्या गेदरिंगला येतो, म्हणून दिलेलं वचन अचानक मोडायचं आणि वर्षाच्या शेवटी त्याच मिश्राला प्रमोशन मिळालेलं पाहूनही त्राग्यापलीकडे आपण काहीच करायचं नाही.... कायमच्या या वैतागाला कंटाळून महिनाभर नोकरी सोडून घरच्यांबरोबर राहण्याचा मोह झालाच, तर त्याला निष्काळजीपणा म्हणावा का?

कॉलनीमधल्या छोट्या पोरांना पाहून झाला एखाद दिवस क्रिकेट खेळण्याचा मोह; सोपा बॉल येताना पाहून झाला त्याला लगावून देण्याचा मोह; त्याने आपल्याच शेजारच्यांच्या खिडक्यांचा वेध घेतलेला पाहून झाला पळून जाण्याचा मोह; तर चुकलं कुठे? एखाद दिवस हो... एखाद दिवस... फक्त! 'लोक काय म्हणतील!' या धृवपदाखाली आपण आयुष्यातले कित्येक क्षण वाया घालवत असतो. आजूबाजूचं कुणीतरी पाहील म्हणून आपण गाडीवरची पाव भाजी टाळतो; 'काय वाटेल तिला!', म्हणत लाडक्या मैत्रिणीला जेवायला घेऊन जाण्याचा विचार आपण गुंडाळून ठेवतो; संदीप खरेच्या कवितांना चारचौघांत उत्स्फूर्त दाद द्यायची म्हटलं, तर 'म्यानर्स' आडवे येतात; मनापासून आवडत असली, तरी वय आठवून 'फ्रूटी' पिणं आपल्याला पटत नाही... खरंतर हे आणि असे बरेच मोह आपल्याला वेळोवेळी होत असतात. पण आपण त्यांना बळी पडत नाही.

सिगरेटचा एखादा झुरका किंवा दारूचा एखादा पेग क्षणिक समाधान मिळवून देत असेलही; पण त्या मोहांपेक्षा कित्येक असे मोह आहेत, जे दीर्घकाळ आनंद देऊ शकतात. जसं की आईच्या कुशीत जाऊन विसावणं.... कितीही वय झालं, तरी हे सुख कमी होऊच शकत नाही. एखाद दिवस जुनी सी.डी. आणून टोम आणि जेरीची पकडापकडी पाहा. सी.डी. संपूच नये, असं वाटत राहील. आणि तसं वाटलंच ना, तर आणा आणखी एक सी. डी.! काही मोह आवरू नयेतच! एखाद दिवस उगीच फोन उचलावा, समोर दिसेल तो अनोळखी नंबर फिरवावा आणि एखाद्या 'राँग' व्यक्तीशी चावटपणा करावा.... असेल थोडी आगाऊगिरी... पण कधीतरी काय हरकत आहे? जवळची चार-पाच कुटुंब एकत्र गप्पा मारत बसलेली असताना, येते एकदम हुक्की... घालावी (आपल्याच!) बायकोकडे पाहून शीळ; मारावी लाईन इतरांदेखत... मला सांगा, कधीतरी हे असं वात्रटपणे वागायला काय हरकत आहे? बसावं एखाद्या रविवारी संध्याकाळी बाबांबरोबर पत्ते कुटत... भिकार-सावकारचे डाव कितीही वेळ रंगू शकतात.... अगदी कंटाळा येईपर्यंत.... मांडावेत ते तसे... त्यातही बेभान होता येतं. जळालं एखादं पान तर करावा आरडा-ओरडा... भांडावं बाबांशी! ... काही मोह खरंच टाळू नयेत.

पहिला मुलगा झाल्यावर नाचावसं वाटलंच जर हॉस्पिटलमध्ये... तर कशाला थांबायचं? नाचावं निवांत! भर मीटिंगमध्ये वाटला चहा बशीतून प्यावासा.... तर बिनधास्त प्यावा. स्वत:च्या गाडीतून जाण्याऐवजी वाटलं लाल डब्यानी जावंसं; शेवटच्या रांगेत बसून वाटलं खिडकीतून डोकं बाहेर काढावसं; तर सूचना वाचत बसू नये. एखाद्याचं लिखाण वाचून वाटल्या शिव्या घालाव्याश्या, तर त्या घालाव्यात! असले मोह आनंद देणारे असतात. त्यांना बगल देऊ नये!

कसं आहे ना... वेळ ही अशी गोष्ट आहे की, ती कधी थांबत नाही आणि कुणाला थांबूही देत नाही. पण आपण त्या घड्याळाच्या काट्याबरोबर धावता धावता थोडं 'जगलं'ही पाहिजे. वेळ निघून गेल्यावर, आनंद न उपभोगाल्याच दु:ख पश्चात्तापाशिवाय काहीच देत नाही. आयुष्याच्या शेवटी आपल्याच आयुष्याचा अलबम डोळ्यांखालून घालताना, असं नको वाटायला की, 'खूप काही मिळवलं खरं; पण जगायचंच राहून गेलं; मिळवलेलं उपभोगायचं राहून गेलं!'. ... पटतंय ना? ... खरं सांगा, पटतंय ना? ... अहो! मग करा की तसं मान्य... वागा की तसं... द्या बरं टाळी... :-)